शहरातील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. विशेषतः महामार्गावरील अतिक्रमण दूर करण्यावर भर दिला जात आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा गांधी चौक, नेताजी सुभाष चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा फुले चौक तसेच बस स्थानक परिसरातील अतिक्रमणावर बुलडोझर चावण्यात आले आहे. परंतू काही बड्या व्यवसायिकाचे अतिक्रमण हटवण्यात आलेले नाही. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेत दुजाभाव करण्यात आल्याचा आरोप नागरिकाकडून केला जात आहे. ‘दैनिक दिव्य मराठी’ मध्ये अतिक्रमणाविरोधात वारंवार बातमी प्रकाशित करण्यात आली होती हे विशेष:ता पुसद शहरातील रहदारीच्या मार्गावर अतिक्रमणावर कारवाई होत आहे. मात्र शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर अडथळा ठरणारे अतिक्रमण तसेच आहे. काही चौकांत आणि रस्त्यांवरून वाहतुकीस अडथळा होणारी दुकाने, हातगाड्या आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पोलिस बंदोबस्त कारवाईला प्रारंभ केल्यावरही अतिक्रमण धारक जागा सोडण्यास तयार नाही. अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी अनेक वेळा ‘दैनिक दिव्य मराठी’ने पाठपुरावा केला होता. त्यावेळी पालिकेने काही प्रमाणात अतिक्रमण हटवले. मात्र काही महिन्यांतच तीच अतिक्रमणे पुन्हा पूर्ववत झाले आहेत. सध्या प्रशासनाच्या पुढाकारामुळे काही भागात अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू आहे. नगरपरिषदेनेही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतल्यास शहरात वाहतूक सुरळीत होईल. नागरिकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळेल. पोलिस व नगरपालिकेकडून अतिक्रमण हटवण्यासाठी लाखो रुपये खर्च करीत आहे. परंतू काही दिवसानंतर पुन्हा अतिक्रमण होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. परिसरातील अतिक्रमण कायमस्वरूपी हटवण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेत कायमस्वरूपी अतिक्रमण हटल्यास अतिक्रमणामुळे मृत्यू झालेल्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली मिळेल असे जागरूक नागरिकाकडून बोलल्या जात आहे.