निकृष्ठ धान्य पुरवठ्याचा भाकपकडून तीव्र निषेध:तहसीलदारांना दिले निवेदन, गहू खाण्यास चांगला नसून तांदळामध्ये बारीक चुरी, भुकटी मिश्रीत कण‎

सरकारी स्वस्त धान्य दुकानांतून नागरिकांना पुरविण्यात आलेले धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान खाण्यायोग्य धान्य मिळावे, या मागणीसाठी तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. भाकप चे तिवसा तालुका सचिव कॉ.प्रकाश सोनोने यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. केंद्र व राज्य सरकार गरीब आणि निराधार जनतेला अन्नावाचून कोणी राहु नये, प्रत्येकास उपजिविका करता यावी, या उदात्त हेतूने प्रतिमानसी प्रतिमाह तीन किलो तांदूळ व दोन किलो गहु देत आहे. सध्या एप्रिल ते जून या तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी पुरविण्यात आले आहे. मात्र यावेळचे गहू-तांदुळ हे खाण्यायोग्य नसल्याने भाकपने त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्यामते हे धान्य एवढे खराब दर्जाचे आहे की ते लाभार्थ्यांना आहारात घेणे महा कठीण झाले आहे. गहु हा खाण्यास चांगला नसुन तांदुळ मध्ये बारीक चुरी व भुकटी मिश्रीत आहे. सदर पुरवठा करणारा ठेकेदार,व त्यावर नियंत्रण करणारे पुरवठा अधिकारी यांची मिली भगत असल्याचे यामधून स्पष्ट होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाऊन सुधारित धान्य पुरवले जावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवाय गेल्या चार दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये होत असलेली दर वाढ व मिळण्यास होत असलेली चणचण याचाही निषेध नोंदविण्यात आला.

Leave a Comment

error: Content is protected !!