भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) आकाशीय विजेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना महत्त्वाचा ‘अलर्ट’ जारी केला आहे. पावसाळ्यात वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, भारतात दरवर्षी विजेच्या धक्क्याने २,५०० हून अधिक नागरिकांचा बळी जातो. या पार्श्वभूमीवर, नागपूर हवामान विभागाने विशेष मार्गदर्शिका प्रसिद्ध केली आहे. हवामान विभागाने विजेच्या तीव्रतेबद्दल माहिती दिली आहे. आकाशातून पडणाऱ्या विजेमध्ये १० लाख ते १ अब्ज व्होल्टपर्यंतचा विद्युत दाब असतो. तिचे तापमान ५४,००० अंश फॅरेनहाइटपर्यंत पोहोचते, जे सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा पाच पटीने अधिक आहे. ही वीज झाडांवर किंवा मानवी शरीरावर पडल्यास तात्काळ गंभीर परिणाम होतात. वादळ-पावसाच्या वेळी मोकळ्या जागेत असताना, जर अचानक डोक्याचे किंवा मानेच्या पाठीवरील केस उभे राहिल्यास, अत्यंत सावधगिरी बाळगावी. हवामान विभागाच्या मते, हे तुमच्या आसपासच्या हवेत तीव्र विद्युत प्रभार निर्माण झाल्याचे संकेत आहे, ज्यामुळे तुमच्यावर वीज कोसळण्याचा धोका असतो. अशा स्थितीत, तात्काळ जमिनीवर सपाट न झोपता, दोन्ही पाय जवळ घेऊन, गुडघ्यावर डोके ठेवून आणि कान हाताने बंद करून उकिडवे बसावे. या स्थितीमुळे विजेचा थेट संपर्क टाळता येतो आणि जीवितहानीचा धोका कमी होतो. हवामान विभागाने सुरक्षिततेसाठी आंतरराष्ट्रीय ‘३०/३० नियम’ पाळण्याचे आवाहन केले आहे. या नियमानुसार, आकाशात वीज चमकल्यापासून तिचा गडगडाट ऐकू येईपर्यंत ३० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळ लागत असेल, तर वादळ जवळ असल्याचे समजावे आणि तात्काळ पक्क्या घराचा आसरा घ्यावा. तसेच, विजेचा शेवटचा आवाज ऐकल्यानंतरही पुढील किमान ३० मिनिटे घराबाहेर पडू नये. वादळ ओसरतानाही वीज पडण्याचा धोका कायम असतो, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. विजेपासून बचाव करण्यासाठी काही चुका टाळणे आवश्यक आहे. वीज चमकत असताना विरल किंवा एकट्या झाडाखाली उभे राहू नये. मोकळी मैदाने, शेत किंवा पाण्याच्या साठ्यांजवळ उभे राहणे टाळावे. चारचाकी गाडीच्या आत असणे सुरक्षित मानले जाते, परंतु गाडीचे रबरी टायर विजेपासून पूर्ण संरक्षण देतात हा निव्वळ भ्रम आहे, असेही भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) स्पष्ट केले आहे.
सावधान! वीज चमकताना त्वरित उकिडवे बसा:वीज चमकताना डोक्याचे केस उभे राहिल्यास खबरदारी घ्या, हवामान विभागाचा ‘अलर्ट’
auto_awesomeथोडक्यात महत्त्वाचे
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) आकाशीय विजेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना महत्त्वाचा 'अलर्ट' जारी केला आहे. पावसाळ्यात वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, भारतात दरवर्षी विजेच्या धक्क्याने २,५०० हून अधिक नागरिकांचा बळी...