विधान परिषद निवडणुकीचा रणसंग्राम ऐन रंगात आलेला असतानाच अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे निष्ठावंत नेते आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आज (शनिवारी) दुपारी 3 वाजता मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे असलेल्या तनपुरे यांच्या या बंडामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. प्राजक्त तनपुरे म्हणाले की, मी आज भाजपमध्ये प्रवेश करत आहे. पण हा निर्णय घेत असताना माझे मामा जयंत पाटील किंवा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सांगण्याची किंवा त्यांची भेट घेण्याची माझ्यात हिंमत नाही. मतदारसंघातील सध्याच्या अडचणी आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधारी पक्षात जाण्याचा निर्णय घ्यावा लागला. ज्या कार्यकर्त्यांच्या बळावर आजवर राजकीय संघर्ष केला, त्यांच्या भावना आणि त्यांच्या राजकीय भविष्याचा विचार करणे गरजेचे आहे. पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिलेंना केली मदत विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मध्यस्थी केली होती. त्याच वेळी तनपुरे यांचा भाजप प्रवेश आणि विधान परिषदेची उमेदवारी पडद्यामागे निश्चित झाली होती. तीन दिवसांपूर्वी मामा जयंत पाटील यांचा फोटो स्टेटसवर ठेवत त्यांनी सूचक संकेत दिले होते, तर शुक्रवारी सकाळी त्यांच्या कार्यालयाने या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला. आज त्यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. येणाऱ्या काळात भाजपच्या गळाला आणखी किती नेते लागतात हे पाहावे लागणार आहे. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील अनेक संस्थानिक, कारखानदार राजकीय कुटुंबांनी शरद पवारांची साथ सोडली. त्यामुळे एकेकाळी पवार यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या जिल्ह्यात आता शरद पवारांच्या पक्षाचे अस्तित्व धोक्यात आल्याचे चित्र आहे. पाचपुते, पिचड, काळे, कोल्हे, घुले, राजळे या व इतर मातब्बर राजकीय घराण्यांनी गेल्या काही वर्षांत शरद पवारांची साथ सोडली. आता तनपुरे कुटुंबानेही भाजपची वाट धरल्याने पवारांना आणखी एक धक्का बसला आहे. दिग्गज नेत्यांच्या जाण्याने पक्षाचे तळागाळातील नेटवर्क कमकुवत होत असून, पवार गटाला नव्याने संघटना बांधणी करावी लागेल. विखे पिता-पुत्रांची होणार राजकीय कसरत प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशामुळे राहुरी तालुक्याच्या राजकारणात उलथापालथ होणार असून, भाजपमध्येच आता ”तनपुरे गट” आणि ”कर्डिलेगट” अशी दोन तुल्यबळ सत्ताकेंद्रे निर्माण होणार आहेत. कालपर्यंत एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी असलेले हे दोन्ही नेते आता एकाच पक्षात आल्यामुळे कार्यकर्त्यांचीही कोंडी होण्याची शक्यता आहे. या दोन्ही गटांना सामावून घेत राहुरी तालुक्यात पक्षाचे काम पुढे नेण्याचे आव्हान पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी खासदार सुजय विखे यांच्यासमोर असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, बाजार समिती आणि इतर निवडणुकांमध्ये या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या महत्त्वाकांक्षा कशा पूर्ण करायच्या यासाठी विखे पिता-पुत्रांना राजकीय कसरत करावी लागणार आहे. आमदार कर्डिलेंसाठी माघारीनंतर ईडीची क्लीन चीट राहुरी पोटनिवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतल्याने भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा विजय सुकर झाला होता. त्याच वेळी तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली होती. या माघारीच्या मोबदल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तनपुरे यांना विधान परिषदेवर घेण्याचा शब्द दिला होता, असे आताच्या घडामोडींवरून स्पष्ट होते. तनपुरें च्या मागे लागलेला ईडीचा ससेमिरा आणि माघार घेताच त्यांना या प्रकरणात मिळालेली”क्लीन चीट” या बाबीही त्यांच्या भाजप प्रवेशामागचे कारण आहे.