विधान परिषदेच्या जागावाटपावरून महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच सुरू असून, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या दोन जागांवरून भाजप व शिवसेनेत एकमत होत नसल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. या दोनपैकी एक जागा भाजपला मिळावी अशी मागणी होत असतानाच, दुसरीकडे जळगावच्या जागेसाठी शिवसेनेचे स्थानिक आमदार अत्यंत आग्रही असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भात भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत प्रश्न विचारला असता शिंदे म्हणाले, मी दिल्लीत आलो की तिकडे चर्चा होते की एकनाथ शिंदे नाराज आहेत. मी गावी आलो की चर्च होते एकनाथ शिंदे नाराज आहेत, एकनाथ शिंदे दु:खी झाले आहेत. मी मजेत असतो. मी माझा आनंद घेत आहोत. मी बघत असतो की, कोण दु:खी झाले आणि कोण नाराज झाले? कुणाच्या पोटात दुखायला लागले? ते मी आनंदात बघत असतो. विधान परिषदेच्या जागावाटपावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, महायुतीची विधान परिषदेच्या जागावाटपाची चर्चा एक-दोन दिवसांत संपेल. महायुती एकत्रपणे निवडणूक लढेल. मुख्यमंत्र्यांनी जे सांगितले त्यावर चर्चा होईल आणि तो विषय मिटून जाईल. महायुतीच्या बाबतीत मनमोकळेपणाने आणि वादविवाद न करता समन्वयाने आम्ही निर्णय घेत असतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीविषयी विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले, मी अमित शाह यांना भेटलो. तिथे देवंद्र फडणवीस हे देखील होते. आम्ही दोघे होतो. देवेंद्र फडणवीस थांबले आणि मी निघालो. आम्ही राजकीय चर्चेसाठी आलोच नव्हतो. आम्ही राजकीय निर्णय महाराष्ट्रातच घेतो. सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी आम्ही आलो आहोत, अशी माहिती शिंदे यांनी दिली.