हिंगोलीकरांचा प्रवास होणार प्रदूषणमुक्त:आगारात 21 पैकी 4 ‘ई-शिवाई’ बस दाखल, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उदघाटन, होणार आरामदायी प्रवास

हिंगोली आगारासाठी मंजूर झालेल्या २१ ई शिवाई बसपैकी चार बसेस दाखल झाल्या असून सोमवारी ता. १ जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते याबसेसच उदघाटन करण्यात आले. लांबपल्याच्या मार्गावर या बसेस धावणार असून याबसेस मुळे हिंगोलीकरांचा प्रवास आता आणखी आरामदायी व प्रदुषणमुक्त होणार आहे. राज्यात महामंडळाने पर्यावरण पुरक बसेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आगाराच्या मागणी नुसार प्रत्येक आगारासाठी बसेसचा पुरवठा केला जात आहे. हिंगोली आगारातून सोडल्या जाणाऱ्या लांबपल्य्ांच्या गाड्यांसाठी २१ बसेसची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यानुसार महामंडळाकडून पहिल्या टप्यात चार बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेसचे उदघाटन व लोकार्पण जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते झाले. यावेळी हिंगोली शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद बनसोडे, जमादार अशोक धामणे, आगार व्यवस्थापक किशोर महाजन, स्थानकप्रमुख सुनिता गोरे, वाहतूक निरीक्षक फिरोज शेख उपस्थित होते. सदर बसेस केवळ दीड तासात शंभर टक्के चार्ज होत असून त्यानंतर ३०० किलो मिटर अंतरापर्यंत धावू शकते. या बसेसमुळे प्रवाशांचा प्रवास गतिमान, आरामदायी आणि प्रदूषणमुक्त होणार असल्याचे आगार व्यवस्थापक महाजन यांनी सांगितले. या बसेस हिंगोली ते छत्रपती संभाजीनगर, हिंगोली ते नांदेड, हिंगोली ते अकोला, हिंगोली ते परळी तसेच हिंगोली ते रिसोड या मार्गावर धावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढील काळात बसेसच्या उपलब्धतेनुसार बसफेऱ्या सोडल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी या कार्यक्रमास दिगंबर दराडे, सचिन पारीख, वैभव वरवंटे, मुकेश ठोंबरे यांच्यासह ‘ईव्ही ट्रान्स’ व ‘एसव्ही ट्रान्स’ कंपनीचे प्रतिनिधी कसबे, संकेत पवार, सिद्धेश्वर केंद्रे, वलेकर, चौधरी यांच्यासह आगार व वाहतूक विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!