वादळी पावसाने दिलासा; मात्र उकाड्याने जीव होतो कासावीस:यवतमाळ, दिग्रसमध्ये पाऊस; अनेक गावांचा वीजपुरवठा ठप्प‎

नवतपाच्या कडाक्याच्या उष्णतेने होरपळणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याला सोमवारी रात्री झालेल्या वादळी पावसाने काहीसा दिलासा दिला असला तरी, यवतमाळ शहरासह दिग्रस तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली होती. अचानक झालेल्या या बदलामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला आणि उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी दुसऱ्याच दिवशी उकाडा वाढल्याने घामाने अंगाची लाहीलाही होत होती. मात्र हा दिलासा फार काळ टिकला नाही. मंगळवारी सकाळपासूनच सूर्याने पुन्हा तडाखा देण्यास सुरुवात केली. दुपारपर्यंत तापमानात झपाट्याने वाढ झाल्याने शहरासह ग्रामीण भागात उकाड्याची तीव्रता पुन्हा जाणवू लागली. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सोमवारी रात्रीच्या वादळामुळे जिल्ह्यातील काही भागांमध्ये झाडे कोसळणे, वीजवाहिन्यांचे नुकसान होणे आणि वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडल्या. अनेक गावांमध्ये २४ तास उलटूनही वीजपुरवठा सुरळीत झालेला नसल्याने नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय वाढली आहे. वीज वितरण कंपनीकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू असून खंडित झालेला पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांचे पावसाकडे लक्ष हवामान विभागाने पुढील काही दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्यासह काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. मान्सूनच्या आगमनापूर्वीच वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता पावसाकडे लागले असून, यंदा मान्सूनची अधिकृत एंट्री कधी होते याबाबत उत्सुकता वाढली आहे. जिल्ह्यातील नागरिकांना उष्णतेपासून कायमस्वरूपी दिलासा मिळण्यासाठी आता सर्वांची नजर मान्सूनच्या आगमनावर खिळली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!