झरीत जेवण न दिल्याने ढाबाचालकाची झोपेतच तर घाटंजीमध्ये मजुराची हत्या:एकाच दिवशी दोन खुनाची आठवड्याभरातील दुसरी घटना‎

किरकोळ वादातून होणारे खून आणि प्राणघातक हल्ला करण्याच्या घटना आता जिल्ह्यात सातत्याने घडत असल्याचे दिसत आहे. दरम्यान जेवण न दिल्याच्या किरकोळ कारणावरून झरी तालुक्यात मार्की गावामध्ये ढाबा व्यावसायिकाची हत्या करण्यात आली, तर घाटंजी तालुक्यातील अंजी गावामध्ये राहणाऱ्या एका मजुराची अनोळखी आरोपींना हत्या केली. मंगळवार दि. ९ जून रोजी रात्री अवघ्या १२ तासांच्या आत घडलेल्या या खुनाच्या दोन घटनांनी जिल्हा हादरून गेला आहे. विशेष म्हणजे एकाच दिवशी अवघ्या १२ तासांच्या अंतराने दोन खून झाल्याची या आठवडाभरातील ही दुसरी वेळ आहे. यापुर्वी ४ जून रोजी यवतमाळ शहरात अशाच पद्धतीने १२ तासांमध्ये खुनाच्या दोन घटना घडल्या होत्या. झरी | जेवण मिळाले नाही म्हणून संतापलेल्या दोन युवकांनी थेट ढाबा चालकाचाच जीव घेतला. ही धक्कादायक घटना मंगळवार दि. ९ जून रोजी मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास झरी तालुक्यातील मार्की (बु.) गावाजवळील ढाब्यावर घडली. किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचे रक्तरंजित हत्याकांडात रूपांतर झाले असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, खून करून पसार झालेल्या आरोपींना मुकुटबन पोलिसांनी अवघ्या काही तासांतच अटक केली आहे. चंद्रशेखर उर्फ गजानन मोरेश्वर उदकवार (३२) असे मृतकाचे नाव असून ते मार्की (बु.) गावाजवळ अनेक वर्षांपासून ढाबा चालवत होते. या प्रकरणी सचिन सुधाकर टोंगे (वय ३०) व साहिल राजेश काकडे (वय ३८) दोघेही रा. मार्की (बु.) यांना अटक करण्यात आली आहे. गजानन उर्फ आझाद मोरेश्वर उदकवार (वय ३२, रा. मार्की बु.) असे मृत युवकाचे नाव आहे. सचिन सुधाकर टोंगे, साहिल राजेश काकडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, मृतक गजानन याने सुमारे महिनाभरापूर्वीच मार्की-मुकुटबन मार्गावर एक टिनशेडचा ढाबा सुरू केला होता. घाटंजी | कामासाठी बाहेरगावी गेलेल्या मजुराचा मृतदेह गावाजवळील शेतशिवारात संशयास्पद अवस्थेत आढळून आला. ही घटना तालुक्यातील अंजी (नाईक) येथे बुधवार दि. १० जून रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे गावासह संपुर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घाटंजी पोलिसांनी या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. बाळू राम चव्हाण (वय ४२, रा. अंजी नाईक) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, बाळू चव्हाण हे मजुरीची कामे करीत होते. दरम्यान मंगळवार दि. ९ जून रोजी सकाळी ९ वाजेदरम्यान नेहमीप्रमाणे कामासाठी आर्णी जाण्यासाठी निघाले होते. सायंकाळी उशीर होऊनही ते परतले नाही. परिवारातील सदस्यांनी त्यांना फोनवर संपर्क केला असता फोन लागत नसल्याने नातेवाईकांकडे चौकशी केली. दरम्यान गावालगतच्या शेतशिवारात कॅनलच्या बाजुला त्यांचा मृतदेह गावातील एका शेतकऱ्याला आढळून आला. ही माहिती गावात पसरताच एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच पुरावे संकलित करण्याची प्रक्रिया सुरू केली. किरकोळ कारण बेतले थेट जीवावर, कुटुंब उघड्यावर फक्त जेवण न मिळाल्याच्या कारणावरून एका कष्टकरी ढाबा चालकाचा जीव घेण्यात आल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. क्षणिक राग आणि बेजबाबदार हिंसाचारामुळे एका कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे. या घटनेने वाढत्या घटनांमुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!