राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेल्या ग्रामगीतेच्या विचारांचा आणि सामुदायिक प्रार्थनेच्या संस्कारांचा दीप गेली ३५ वर्षे अखंड तेवत ठेवणारे चिंचमंडळ हे गाव आज आदर्श ग्रामविकासाचे प्रेरणास्थान ठरत आहे. सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून गावात केवळ आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले नाही, तर सामाजिक ऐक्य, संस्कार, कला आणि समाजसेवेची मजबूत परंपराही रुजली आहे. गावात उभारण्यात आलेल्या स्वतंत्र प्रार्थना मंदिरात दररोज नियमित सामुदायिक प्रार्थना घेतली जाते. सुब्रमण्यम स्वामी गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून बालकांमध्ये शिस्त, सेवाभाव, राष्ट्रप्रेम आणि नैतिक मूल्यांचे संस्कार रुजवण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. या संस्कारांमधून घडलेल्या अनेक युवकांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. गावातील तबलावादक गोपाल मोरे यांनी आपल्या कलेच्या जोरावर महाराष्ट्रभर चिंचमंडळची ओळख निर्माण केली आहे. तर प्रथमेश मोरे यांनी हार्मोनियम वादन आणि गायन क्षेत्रात विशेष यश मिळवत विदर्भात गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. या यशामुळे गावातील नव्या पिढीला कला आणि संस्कार यांचा सुंदर संगम साधण्याची प्रेरणा मिळत आहे. सामुदायिक प्रार्थनेच्या प्रभावामुळे गावात सर्वधर्मसमभाव, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा दृढ झाला आहे. गावातील अनेक प्रश्न सामंजस्याने सोडवले जातात. वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता, पर्यावरण संवर्धन, सामाजिक जनजागृती आणि विविध सेवा उपक्रम वर्षभर राबवले जातात. कोणत्याही कुटुंबातील शुभकार्य प्रसंगी सामूहिक प्रार्थना घेण्याची परंपराही आजही कायम आहे. याच विचारातून गावातील युवकांनी ‘एक गाव- एक गणपती’ उपक्रम यशस्वीपणे राबवून सामाजिक ऐक्याचा आदर्श निर्माण केला आहे. धार्मिक उत्सवांना समाजोपयोगी कार्याची जोड देत युवक सकारात्मक परिवर्तनाचे वाहक बनत आहेत. या कार्यात गजेंद्र पालकर, योगिता प्रकाश मोरे, खुशाल उरकुडे, गणेश कडू, प्रकाश मोरे, दिलीप मोरे, जीवन चाफले यांच्यासह अनेक प्रार्थना उपासकांचे सातत्यपूर्ण योगदान लाभत आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार केवळ पुस्तकांपुरते न राहता गावाच्या दैनंदिन जीवनात रुजले आहेत. संस्कार, सेवा अन् ऐक्याचा जिवंत वारसा आजच्या बदलत्या काळात सामाजिक मूल्यांची घसरण होत असताना चिंचमंडळ गावाने सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून संस्कारांची परंपरा जिवंत ठेवली आहे. गेल्या ३५ वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमातून शिस्तबद्ध, समाजाभिमुख, कलागुणांनी समृद्ध पिढी घडत आहे. ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक जतनाच्या माध्यमातून चिंचमंडळने आदर्श ग्रामविकासाचा नवा मापदंड निर्माण केला आहे. राष्ट्रसंतांच्या विचारांचा हा वारसा आजही समाजाला प्रेरणा देत आहे.
