मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार, समाजातील जात-धर्म-पंथ यांतील दुरावा कमी करणे आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने गुरुदेव सेवा मंडळ, श्रीरामपूरने पुसद शहरात विविध ठिकाणी ५१ सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थना आयोजित करण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाचा प्रारंभ गुरुवारी आयोजित सामुदायिक प्रार्थना कार्यक्रमातून करण्यात आला. गुरुदेव प्रचारक व खंजिरीवादक सुरेश कदम यांच्या निवासस्थानी वास्तुपूजन तसेच त्यांचे नातू सक्षम याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा संकल्प जाहीर करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भैय्यासाहेब पद्मावार होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुरेश गायकवाड, राष्ट्रीय कीर्तनकार प्रा. आकाश ताविडे, तालुका सेवाधिकारी शिवशंकर नागरे आणि गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष गणेश धर्माळे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गजानन महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून झाली. त्यानंतर मौन प्रार्थना, नामधून, नामजप, शांतिपाठ आणि आत्मचिंतनाचा कार्यक्रम पार पडला. सामुदायिक प्रार्थना ही राष्ट्रीय एकात्मतेचे प्रभावी साधन असून त्यातून मनाची शुद्धता, परस्पर प्रेम आणि बंधुभाव निर्माण होतो, असे प्रतिपादन शिवशंकर नागरे यांनी केले. मंडळाचे अध्यक्ष गणेश धर्माळे यांनी यापूर्वी राबविलेल्या उपक्रमांना मिळालेल्या यशाचा उल्लेख करत पुसद तालुक्यातील विविध भागांत ५१ सामुदायिक प्रार्थना आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त केला. डॉ. सुरेश गायकवाड यांनीही हा संकल्प समाजाच्या सहकार्याने निश्चित पूर्णत्वास जाईल, असा विश्वास व्यक्त केला. अध्यक्षीय समारोपात भैय्यासाहेब पद्मावार यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करत या अभियानास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात पूजा आणि रवींद्र कदम यांचा सत्कार करण्यात आला. तसेच चि. सक्षम यास वाढदिवसानिमित्त आशीर्वाद देण्यात आले. या नंतर आयोजित भजन संध्येत विविध संतांच्या रचनांचे सादरीकरण करण्यात आले. शिवलिंग पटवे, किसन गरडे, अनिल अस्वार, किशोर राऊत यांच्यासह अनेक कलाकारांनी सहभाग घेतला. महिला प्रतिनिधींनीही भजन गायनातून वातावरण भक्तिमय केले. राष्ट्रवंदनेनंतर सामूहिक भोजनासह कार्यक्रमाची सांगता झाली. शहर, तालुक्यात वर्षभर चालणार प्रार्थना अभियान गुरुदेव सेवा मंडळाने १८ जून २०२६ ते २९ एप्रिल २०२७ या कालावधीत पुसद शहर व तालुक्यातील विविध भागांमध्ये ५१ सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थना आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि मानवतेचा संदेश समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे.