विठुरायाच्या भेटीसाठी निघाली सद्गुरू जगन्नाथ बाबांची पालखी:मारेगावात वारकऱ्यांचे स्वागत; रिंगण सोहळ्याने भक्तिरसाची उधळण‎

आषाढी वारीच्या पवित्र पर्वाला सुरुवात होताच सद्गुरू जगन्नाथ बाबांची पारंपरिक पालखी निर्जला एकादशीच्या शुभमुहूर्तावर वणी येथील नंदेश्वर देवस्थानातून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झाली. विठ्ठलनामाच्या अखंड गजरात, टाळ-मृदंगाच्या तालावर आणि भगव्या पताकांच्या साक्षीने निघालेल्या या पालखी सोहळ्याने परिसर भक्तिमय झाला. वारकरी, महिला, युवक आणि ज्येष्ठ भाविक मोठ्या उत्साहाने पायी वारीत सहभागी झाले आहेत. “जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल”च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले असून अभंग, भजन आणि नामस्मरणाच्या साथीने वारकरी विठुरायाच्या भेटीची ओढ मनात घेऊन पुढे मार्गक्रमण करत आहेत. पालखीचे मारेगाव शहरात आगमन होताच विविध सामाजिक संस्था, व्यापारी, नागरिक आणि भाविकांनी ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत केले. पुष्पवृष्टी, आरती आणि विठ्ठलनामाच्या जयघोषात पालखीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शहरातील मुख्य मार्ग भगव्या पताकांनी आणि वारकऱ्यांच्या उत्साहाने फुलून गेला. सायंकाळी मार्डी चौकात पालखीचे आगमन झाल्यानंतर वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर यांनी काही अंतर पालखीसोबत पायी चालत वारकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी संत परंपरेचे जतन करणाऱ्या वारकऱ्यांचे कौतुक करत सर्वांना आषाढी वारीच्या शुभेच्छा दिल्या. रात्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात पालखीचा मुक्काम झाला. यावेळी पार पडलेल्या पारंपरिक रिंगण सोहळ्याने भाविकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. टाळ-मृदंगाच्या गजरात धावणाऱ्या वारकऱ्यांचा उत्साह, हरिनामाचा अखंड नाद आणि भक्तिभावाने भरलेले वातावरण पाहण्यासाठी मारेगावसह परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते. सद्गुरू जगन्नाथ बाबांची पालखी आता पुढील प्रवास करत आषाढी एकादशीच्या दिवशी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पोहोचणार आहे. संतपरंपरा, भक्ती, समता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी ही वारी आजही लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा आणि अध्यात्मिक ऊर्जेचा अविरत प्रवाह म्हणून कायम आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!