होळकर घाटाच्या पुनर्बांधणीसाठी निधी द्या- मा.आ. स्नेहलता कोल्हे

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र पुणतांबा येथील गोदावरी नदीवरील ऐतिहासिक होळकर घाटाच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात कोल्हे यांनी म्हटले आहे की, श्रीक्षेत्र पुणतांबा हे प्राचीन तीर्थक्षेत्र असून येथे गोदावरी नदी उत्तरवाहिनी होत असल्याने या गावाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सन १७६५ ते १७९५ या कालावधीत येथे भव्य होळकर घाट उभारला होता, तसेच परिसरातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला होता. सद्यस्थितीत गोदावरी तटावर धार्मिक विधी व अस्थी विसर्जनासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करण्यासाठी होळकर घाटाची पुनर्बांधणी करणे गरजेचे आहे. या तीर्थक्षेत्राचा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या दृष्टीने विशेष निधी उपलब्ध करून संबंधित विभागांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी कोल्हे यांनी केली आहे. पुणतांबाचा सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा… पुणतांबा हे प्रख्यात संगीतकार सी. रामचंद्र (रामचंद्र चितळकर) यांचे जन्मभूमी आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या “ए मेरे वतन के लोगो” या अजरामर गीताला संगीत देण्याचे श्रेय त्यांना जाते. येथे गोदावरी तटावर होळकर घाटासह ब्राह्मण घाट आणि विठ्ठल घाट असे तीन प्रमुख घाट असून, परिसरात अहिल्यादेवींनी बांधलेला वाडा आजही जीर्ण अवस्थेत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!