महाराष्ट्रातील तमाम कुस्तीप्रेमींच्या गळ्यातील ताईत आणि प्रसिद्ध ‘महाराष्ट्र केसरी’ पैलवान सिकंदर शेख याच्या वाहनाला सांगली जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी गावाजवळ सिकंदरच्या ‘थार’ गाडीने रस्त्यावरील दुभाजकाला (डिव्हायडर) जोरदार धडक दिली. या अपघाताचे काही फोटो समोर आले असून, यामध्ये गाडीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे. या घटनेमुळे कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पैलवान सिकंदर शेख यांची ‘महिंद्रा थार’ कार रत्नागिरी-नागपूर हायवेवरून जात असताना विठ्ठलवाडी परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्या कडेला असलेल्या साईड डिव्हायडरला अत्यंत वेगाने धडकली. ही धडक इतकी भीषण होती की गाडीच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, चालकाला डुलकी लागली की तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडला? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सिकंदर गाडीत होता का? हा अपघात घडल्यानंतर कुस्ती क्षेत्रात आणि सिकंदरच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मात्र, अपघात झाला तेव्हा स्वतः पैलवान सिकंदर शेख या गाडीमध्ये प्रवास करत होता की नाही, याबाबत अद्याप पूर्ण स्पष्टता आलेली नाही. हायवे पोलिस आणि स्थानिक प्रशासन या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, जर सिकंदर गाडीत असेल, तर त्याला गंभीर दुखापत झालेली असण्याची शक्यता खूप कमी आहे; मात्र गाडीतील अन्य काही जणांना किरकोळ दुखापत झाल्याची चर्चा आहे. “तपास पूर्ण झाल्यानंतरच नेमकी माहिती दिली जाईल,” असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षी पंजाबमध्ये झाली होती अटक दरम्यान, गेल्या काही काळापासून सिकंदर शेखचे ग्रह काहीसे फिरल्याचे दिसत आहे. मागील वर्षी सिकंदर शेख एका वादामुळे चर्चेत आले होते. पंजाबमधील एका प्रकरणात त्यांना अटक झाली होती. ज्यामुळे त्याचे चाहते चिंतेत होते. मात्र, त्या संकटातून बाहेर पडत सिकंदरने कुस्तीच्या मैदानात जोरदार कमबॅक केले आणि एकापाठोपाठ एक अनेक मैदानं मारून स्वतःचे स्थान पुन्हा सिद्ध केले. आता कुठे त्याचे दिवस पुन्हा सुखाचे जात असतानाच या अपघाताची बातमी आल्याने त्याचे चाहते पुन्हा एकदा चिंतेत पडले असून, तो सुखरूप असावा यासाठी प्रार्थना करत आहेत.