अचानक वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने अर्धा तास पुसद शहरात दि. ८ जून रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास हजेरी लावली. अवघ्या काही मिनिटांतच पुसद नगर परिषदेच्या मान्सूनपूर्व नियोजनाची लक्तरे वेशीवर टांगली गेली. पहिल्याच पावसाच्या पाण्यात शहरातील मुख्य बाजारपेठेचा केंद्रबिंदू असलेला सुभाष चौक पूर्णतः तुंबले होते. पालिकेचा नालेसफाईचा दावा किती फोल होता, याचा पुरावाच पावसाने जनतेसमोर आणला आहे. दरवर्षी उन्हाळा संपताना पुसद नगर परिषद मान्सूनपूर्व नालेसफाईच्या नावाखाली लाखो रुपयांच्या निधीची तरतूद करते. नाल्यांमधील गाळ काढणे, पाण्याचा निचरा होण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवणे, हे केवळ कागदावरच दिसून येत आहे, याचा प्रत्यय आज पुसदकरांना आला. आज दुपारी शहरात पावसाला सुरुवात झाली आणि काही वेळातच पाणी वाहून जाणाऱ्या शहरातील प्रमुख नाल्या व गटारे पूर्णपणे चोकअप असल्याचे दिसून आले. नाल्या तुंबल्यामुळे पाण्याचा निचरा न होता, शहरातील गजबजलेला सुभाष चौक एखाद्या मोठ्या तलावासारखा दिसू लागला. या पहिल्याच पावसाने नगर परिषदेचा “स्मार्ट’ कारभाराचा बुरखा फाडला आहे. सुभाष चौकातील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागली. “जर पहिल्याच पावसाची ही अवस्था असेल, तर पुढील चार महिने पुसदकरांनी जगायचे कसे?’ असा संतापजनक सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण झाल्याचा दावा करणाऱ्या अधिकाऱ्यांचे तोंड आता या तुंबलेल्या पाण्यामुळे पूर्णपणे बंद झाले आहे. दरवर्षी केवळ निविदा काढून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचे काम पालिका प्रशासन करत असल्याचा थेट आरोप नागरिकांनी केला आहे. या निष्काळजी कारभारामुळे शहराची नाचक्की झाली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, प्रशासनाने मुख्य चौक आणि नाल्यांची युद्धपातळीवर सफाई करावी, अशी मागणी शहरवासियांच्या वतीने करण्यात येत आहे.