येथील सहकार भवन, आर्णी रोड येथे १७ मे रोजी जिल्हास्तरीय आदिवासी समाजाच्या कृतज्ञता तथा कर्तृत्ववान विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला जिल्हाभरातील आदिवासी समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते बंडू मेश्राम होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ. अशोकराव उईके उपस्थित होते. यवतमाळ नगराध्यक्षा ॲड. प्रियदर्शिनी उईके उपस्थित होत्या. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शंभराहून अधिक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. नुकत्याच झालेल्या दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. याप्रसंगी बिना अशोक उईके, दशरथजी मडावी, एम. के. कोडापे, ॲड. प्रमोद घोडाम, राजू चांदेकर, प्रल्हाद सीडाम, राजू मडावी, मनोज गेडाम, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व अतिथींच्या हस्ते सत्कारमूर्तींचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी दिल्ली विद्यापीठातून डॉक्टरेट प्राप्त केलेल्या डॉ. तुषार आत्राम आणि डॉ. प्रफुल आडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. राजू मडावी यांची गटशिक्षणाधिकारी पदावर पदोन्नती झाल्याबद्दल सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. तुषार आत्राम यांनी केले. ॲड. प्रियदर्शिनी उईके, दशरथ मडावी, ॲड. प्रमोद घोडाम, राजू चांदेकर आणि एम. के. कोडापे यांनीही प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. कार्यक्रमात दहावी-बारावी, कला, वाणिज्य, विज्ञान, एमबीबीएस, इंजिनिअरिंग आणि इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या बांधवांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. प्रफुल आडे यांनी केले. आभार सुभाष गेडाम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नंदू अरके, अरुण पोयाम, राजू गेडाम, अशोक गेडाम, राजू कीनाके, किशोर सलामे, माणिक मडावी, विजय मडकाम, पुरुषोत्तम घोडाम, पवन मंगाम, आकाश चांदेकर, निलेश चांदेकर, अविनाश पेंदाम, राजेश नागभिडकर, आशिष मेश्राम आदींनी परिश्रम घेतले. सर्वांनी संयुक्त प्रयत्न करणे गरजेचे यावेळी आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ. अशोकराव उईके यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “एकत्रित प्रयत्नांनी समाज पुढे जातो. आदिवासी समाजाने एकजुटीने राहून अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. समाजातील शेवटच्या घटकाच्या विकासासाठी सर्वांनी संयुक्त प्रयत्न करणे गरजेचे आहे.”