शेतीसह घरगुती, व्यावसायिक पाणीपट्टीत 10%वाढ प्रस्तावित:1 जुलैपासून दहा टक्क्यांपर्यंत दर वाढवण्याचा प्रस्ताव, शासनाला 2 हजार 300 काेटींचा महसूल अपेक्षित

एकीकडे महाराष्ट्रातील जनता पावसाकडे डोळे लावून बसलेली असताना दुसरीकडे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने विविध धरणातून किंवा जलस्त्रोतातून शेतीला आणि शहरांना पिण्यासाठी होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या दरात 2026 ते 2029 या कालावधीसाठी दहा टक्क्यांपर्यंत वाढ प्रस्तावित केली आहे. दरम्यान, प्रस्तावाच्या सविस्तर मसुद्यात कृषीसाठी वापराच्या पाण्यात 2022 पासून घट झाली असून औद्योगिक आणि घरगुती पाण्याचा वापर मात्र वाढल्याचे समोर आले आहे. नियमन प्राधिकरणाने 2026 ते 2029 या तीन वर्षांसाठी दिलेल्या प्रस्तावानुसार 1 जुलैपासून नवीन दराची अंमलबजावणी होणार आहे. पाण्याचे दर हे हजार लिटर प्रमाणात आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नागपूर, नाशिक, ठाणे यांसारख्या महानगरपालिका दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी उचलतात. घरगुती वापरासाठी दर 55 पैशांवरून 80 पैसे, वाणिज्यिक वापरासाठी 2.75 रुपयांवरून 4 रुपये दर कमी प्रमाणात वाढल्यासारखे दिसत असले तरी वापराचे प्रमाण प्रचंड असल्याने महापालिकांच्या पाणीपुरवठा वार्षिक खर्चात कोट्यवधी रुपयांची वाढ होऊ शकते, तर शासनाला या दरवाढीतून 2026 ते 2029 या कालावधीसाठी 2 हजार 300 कोटींचा महसूल अपेक्षित आहे. दरवाढ 10 टक्क्यांच्या पुढे जाणार नाही, अशी मार्गदर्शक तत्वे सांभाळूनच प्रस्ताव तयार केल्याची माहिती प्राधिकरणाच्या सहायक संचालक प्रियंका सकटे (मंबई) यांनी सांगितले. पिण्याचे पाणी वाढण्याची ही कारणे नागरीकरण, वाढती लोकसंख्या, शहरांची वाढती तहान, कृषीसाठीचा पाणीपुरवठा घटतो, वर्षभर होणारा अनियमित पाऊस, बदलते हवामान, शेतीत होत असलेले वेगवेगळे प्रयोग घरगुती वापर आश्वासित पाणीपुरवठा प्रस्तावित महानगरपालिकांच्या घरगुती वापरासाठी आश्वासित पाणीपुरवठा (धरण, नदी, जलाशयातून) 55 पैशांवरून 80 पैसे, नियंत्रित (राखून ठेवलेले पाणी) दर 1.10 रुपयांवरून 1.60 रुपये, अंशतः आश्वासित दर 28 पैशांवरून 40 पैसे.
पिण्याचे पाणी 18 % वरून 21 टक्क्यांपर्यंत राज्यातील पाणी वापराची स्थिती तपासल्यानंतर सिंचनाचा वाटा 2020-21 ते 2022-23 मध्ये 74 ते 76 टक्क्यांवरून 2023-24 मध्ये 69.47 टक्क्यांवर तर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा 17.96 वरून 21.09 टक्क्यांपर्यंत वाढला. औद्योगिक वापराचा वाटा 3 ते 4 टक्के स्थिर आहे. इतर 1.73 टक्क्यांवरून 5.86 टक्क्यांपर्यंत वाढला. राज्यातील एकूण पाणीवापरात सिंचनाचा वाटा सर्वाधिक असला तरी त्यात घट होत आहे. दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा वाटा 18 टक्क्यांवरून 21 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. निमशहरी, ग्रामीण भागात 15 ते 30 पैसे दरवाढ नगरपालिका, नगरपंचायतींसाठी आश्वासित दर 35 पैशांवरून 50 पैसे, नियंत्रित दर 70 पैशांवरून 1 रुपया आणि अंशतः आश्वासित दर 18 पैशांवरून 25 पैसे करण्याचा प्रस्तावात नमूद केले आहे. आश्वासित पाणीपुरवठ्यासाठी ग्रामपंचायतींना सध्या प्रति घनमीटर 30 पैसे दर आकारला जातो. तो वाढवून 2 रुपये, नियंत्रित दर 60 पैशांवरून 4 रुपये, तर अंशतः आश्वासित दर 15 पैशांवरून 1 रुपये असे दर प्रस्तावित आहेत. या सर्व श्रेणींमध्येही जवळपास 10 टक्क्यापर्यंत वाढ सुचविण्यात आली.

Leave a Comment

error: Content is protected !!