रोहित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात काल अजित पवारांचा अपघात, घातपात, संशयास्पद मृत्यू या गोष्टींवर सविस्तर चर्चा झाली. यावर उद्धव ठाकरेंची स्पष्ट भूमिका आहे की अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणाची सविस्तर चौकशी झाली पाहिजे, अजित पवार यांच्याबाबतीमध्ये त्यांचे कुटुंब आणि भाजपची लोकं काही बोलायला तयार नाही, तुम्ही काय दडवतंय? काय रहस्य आहे, तुम्ही कोणाला वाचवत आहात? हे सर्वांना जाणून घ्यायचे आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, शरद पवार यांच्यावर अजून उपचार सुरू आहेत. ते काल जरी रुग्णालयातून घरी आले आहेत. त्यांना गर्दीत जावू नये असे डॉक्टरांनी सांगितले आहे, त्यामुळे तांत्रिक प्रक्रिया त्यांच्या निवासस्थानी पूर्ण केल्या जातील आणि त्यानंतर आम्ही विधानभवनात त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहू. मविआकडे अपेक्षित संख्याबळ संजय राऊत म्हणाले की, राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. महाराष्ट्रातून विरोधी पक्षाला एकच जागा मिळते आहे ती सुद्धा आम्ही एकत्र राहिलो तरच. त्यामुळे शरद पवार यांच्या नावावर सर्वांनी सहमती दर्शवली. आदित्य ठाकरे सांगत होते ते खरे आहे की, सर्वाधिक मोठा पक्ष हा शिवसेना आहे आम्ही ती जागा लढवायला हवी त्यांची भूमिका योग्यच होती. त्यानंतर काँग्रेसकडे 16 तर राष्ट्रवादीकडे 10 आमदार आहेत. तरीही ही जागा शरद पवार यांच्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. तिन्ही पक्षांनी एकत्र येत शरद पवारांना आम्ही राज्यसभेवर पाठवणार आहोत. आमच्याकडे जागा जिंकण्यासाठी ज्या संख्याबळाची गरज आहे ते आमच्याकडे आहे. आता काँग्रेस आणि शिवसेनेत चर्चा होईल कारण राष्ट्रवादीला आता राष्ट्रवादीला राज्यसभा देण्यात आली आहे. म्हणून चतुर्वेदींची संधी हुकली संजय राऊत म्हणाले की, जयंत पाटील यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबद्दल भूमिका स्पष्ट केली. अजित पवार होते तेव्हापासून माझे स्पष्ट मत होते की विलीनीकरणाच्या या दंतकथा आहेत. यातून काही होणार नाही हे मला तेव्हाही वाटत होते. आम्हाला मविआ म्हणून काम करावे लागणार आहे. ती आमची मानसिकता आहे. विरोधी पक्षाने उगाच सत्तेच्या मागे आता धावू नये, येणाऱ्या निवडणुकीची तयारी करावी असे आमचे सर्वांचे मत आहे. प्रियंका चतुर्वेदी यांच्यासाठी आमच्या सरव्यांच्या प्रार्थना होत्या. त्या आमच्या सहकारी होत्या. त्यांनी राज्यसभेत चांगले काम केले, पण गणित जुळत नसल्याने त्यांना राज्यसभेच्या बाहेर रहावे लागले. जर गणित जमले असते शरद पवार निवडणूक लढवण्यासाठी उभे राहिले नसते तर त्यांनी ही जागा लढवली असती. हा विनोद तावडेंचा कार्याचा सन्मान संजय राऊत म्हणाले की, विनोद तावडे यांना राज्यसभा देणं म्हणजे काही त्यांचे पुनर्वसन नाही. विनोद तावडे यांच्या सारखे कार्यकर्ते हे सतत पक्षासाठी काम करत असतात, त्यांना मी अनेक वर्षे ओळखतो. त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम सुरू केले ते महाराष्ट्र, दिल्ली, बिहार, केरळमध्ये त्यांनी काम केले आहे. त्यांनी केलेल्या कामाची पक्षाने दखल घेतली तर तो एका कार्यकर्त्यांच्या सन्मान असतो. विनोद तावडे यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर काढण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. त्यासाठी एक विशिष्ट गट सक्रिय होते. इतके असूनही तावडे यांनी संघटन बांधणीचे काम सुरू ठेवले. पक्षाचे सचिव, सरचिटणीस आणि अनेक राज्यातील त्यांची कामगिरी यातून त्यांना हे उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप चुकतंय असे वाटत नाही संजय राऊत म्हणाले की, बिहारमध्ये भाजपच्या विधानसभेला जनता दलपेक्षा 40 जागा जास्त निवडून आल्या आहेत. नितीशकुमार यांचा सन्मान म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. पण आता त्यांची प्रकृती आणि मानसिक स्वास्थ ठीक नाही अशी माहिती सातत्याने समोर येत आहे. म्हणून त्यांना राज्यसभेवर पाठवून बिहारचे नेतृत्व भाजपच्या नेत्याकडे द्यावे तर हा त्यांचा प्रश्न आहे. त्यात काही चुकतंय असे मला काही वाटत नाही.
