आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यात मुंबईतील जागावाटपावर सातत्याने चर्चा सुरू आहेत. या चर्चांमधून आता महायुतीचा मुंबईसाठीचा नवा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. 2026 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत एकूण 227 जागांपैकी भाजप 140 जागांवर तर शिंदे गटाची शिवसेना 87 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. महायुतीतील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र मुंबईत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने, भाजप आणि शिवसेना मिळूनच सर्व 227 जागा लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. जागावाटपाबाबतच्या चर्चांचा मागोवा घेतला तर सुरुवातीला भाजपने शिंदे गटासाठी मुंबईत केवळ 52 जागा सोडण्याची तयारी दाखवली होती. त्यामुळे शिवसेना शिंदे गटात नाराजीची चर्चा रंगली होती. मात्र ठाकरे बंधूंच्या युतीनंतर राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली. विरोधकांची एकजूट लक्षात घेता भाजपने आपली भूमिका लवचिक करत शिंदे गटाला अधिक जागा देण्याचे संकेत दिले. त्यानंतर आता 140 आणि 87 असा नवा फॉर्म्युला समोर आला आहे. तरीही या सूत्रावर अधिकृत शिक्कामोर्तब कधी होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसून, अंतिम घोषणेकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने अद्याप एकाही उमेदवाराची घोषणा केलेली नाही. बंडखोरी होऊ नये, यासाठी भाजपने सध्या वेट अँड वॉच धोरण स्वीकारल्याची चर्चा आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर आणि पनवेल या महत्त्वाच्या महानगरपालिका आणि शहरांमधील जागावाटपाचा पेच अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. मात्र भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व ठिकाणचे जागावाटप लवकरच अंतिम होईल आणि त्यानंतर उमेदवारांची घोषणा करण्यात येईल. स्थानिक पातळीवर नाराजी उसळू नये, यासाठी पक्षाकडून अत्यंत सावध भूमिका घेतली जात असल्याचे चित्र आहे. आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. मुंबईसह राज्यातील सर्व महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून, 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाणार आहे. मुंबई महापालिकेत एकूण 227 प्रभागांसाठी मतदान होईल. मुंबई महापालिकेचा कार्यकाळ 7 मार्च 2022 रोजी संपुष्टात आल्यानंतर तेव्हापासून पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला होता आणि किशोरी पेडणेकर या महापौरपदी होत्या. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 23 ते 30 डिसेंबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 31 डिसेंबरला अर्जांची छाननी होईल, तर 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारांना माघार घेता येईल. 3 जानेवारीला अंतिम उमेदवार यादी आणि चिन्हे जाहीर केली जातील. 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेला 84, भाजपला 82, काँग्रेसला 31, राष्ट्रवादी काँग्रेसला 9, मनसेला 7, समाजवादी पक्षाला 6, एमआयएमला 2 आणि 5 अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. या पार्श्वभूमीवर 2026 ची निवडणूक मुंबईच्या राजकारणाला निर्णायक वळण देणारी ठरणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे.
