राज ठाकरे ‘मनसे’ला काँग्रेसच्या दावणीला बांधणार नाहीत. ते त्यांचा पक्ष उबाठामध्येही विलीन करणार नाहीत, याची कल्पना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना आहे. खरे तर संजय राऊतांनी उबाठा वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रादेशिक पक्ष मजबूत करण्याचा प्रश्न विचारल्यावर राऊत गप्प बसतात, कारण त्यांना माहिती आहे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे मजबूत होऊ नये, त्यांचा पत्ता कट करण्यासाठी राऊत काँग्रेसची चाकरी करत आहेत. आता संजय राऊत उबाठा शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करणार का, असा सवाल भाजप प्रवक्ते नवनाथ बन शुक्रवारी केला. नवनाथ बन म्हणाले की, राहुल गांधी काँग्रेस वाढवण्यासाठी काम करत आहेत की काँग्रेस संपवण्यासाठी मुळात याचे उत्तर संजय राऊत यांनी दिले पाहिजे. आजपर्यंत 99 निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा पराभव झाला आहे. काँग्रेस ही नाकर्ते लोकांची पार्टी आहे हे सिद्ध झाले आहे. काँग्रेस हा पक्ष आता वाढणार नाही तर त्यांचे आणखी तुकडे होतील आणि ते वेगवेगळ्या पक्षात विलीन होतील.
जनतेने दुकानाचे शेटर लावले नवनाथ बन म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार वाढवण्यासाठी काय केले. त्यांचे विचार बाजूला सारत तुम्ही तुमचा पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की शिवसेनेची काँग्रेस होईल त्या दिवशी मी माझे दुकान बंद करेल. उद्धव ठाकरेंनी आपले दुकान बंद करण्याची वेळ होती पण त्यांनी तसे न केल्याने जनतेनेच त्यांचे दुकान बंद केले. मविआच्या दुकानाला शेटर लावण्याचे काम जनतेने केले आहे. राऊत उबाठा काँग्रेसमध्ये विलीन करणार का? नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत काँग्रेस वाढली पाहिजे इतर पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन झाले पाहिजे अशी भूमिका पोटतिडकीने मांडताना दिसून येत आहेत. उबाठा वाढवण्यासाठी जितका प्रयत्न राऊत करत नाहीत त्यापेक्षा जास्त प्रयत्न ते काँग्रेस वाढवण्यासाठी आणि राहुल गांधी पंतप्रधान व्हावे यासाठी प्रयत्न करतात. ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांनी आपले पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावे असे सांगितले. मग उबाठा गट सुद्धा तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन करणार आहात का? राहुल गांधी यांना काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राऊत जाहीर करणार आहेत का? असा सवाल बन यांनी केला आहे. राऊतांना राहुल गांधींचीच चिंता नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांच्यावर उबाठाची भूमिका मांडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. पण ते राहुल गांधी यांची भूमिका मांडण्याचे काम आणि काँग्रेस वाढवण्याचे काम राऊतांकडून सुरू आहे. ते उबाठाचे मीठ खात चाकरी राहुल गांधी यांची करत आहेत. इतर पक्ष संपले तरी चालेल पण काँग्रेस वाढावा ही भूमिका घेत संजस राऊत काम करत आहे. राऊतांनी महाभारताचा अभ्यास केला पाहिजे. कौरवाच्या बाजूने संजय होता, म्हणजे मविआ हे कौरव आहेत. तर महायुती पांडवाच्या भूमिकेत आहे.
