मेसमध्ये जास्तीचे जेवण घेतले म्हणून 17वर्षीय विद्यार्थ्याला पाइप, बेल्टने मारहाण:छत्रपती संभाजीनगरमधील ‘भारत करिअर अकॅडमी’तील प्रकार‎

पडेगाव येथील ‘भारत करिअर अकॅडमी” या‎ पोलिस भरती अकॅडमीमध्ये शिकणाऱ्या एका 17 ‎वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याला मेसमध्ये जास्तीचे ‎जेवण घेतल्याच्या क्षुल्लक कारणावरून रबरी ‎पाइप, बेल्ट व काठीने बेदम मारहाण केल्याची ‎धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ‎एवढेच नव्हे, तर क्रूरतेची सीमा ओलांडत ‎विद्यार्थ्याला भिंतीला पाय लावून उलटे उभे‎ राहण्याची अमानुष शिक्षा देण्यात आली.‎ याप्रकरणी क्लासेसचा व्यवस्थापक तथा पीटी‎शिक्षक विवेक ढाकणे याच्या विरोधात छावणी‎ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला‎ आहे.‎ पीडित मुलगा हा मूळचा बुलढाणा येथील ‎रहिवासी आहे. तो गेल्या वर्षीच्या जून ‎महिन्यापासून पडेगाव येथील भारत करिअर ‎‎अकॅडमीत पोलिस भरतीचे प्रशिक्षण घेत आहे. ‎‎मंगळवारी (9 जून) मेसमध्ये जास्तीचे जेवण ‎‎घेतल्याने शिक्षक विवेक ढाकणे याने त्याला ‎‎अमानुषपणे मारहाण केली. घाबरलेल्या मुलाने 9 ‎जून रोजीच आपल्या आईला फोन करून या‎ छळाची माहिती दिली. फिर्यादी आईने तातडीने ‎छत्रपती संभाजीनगर गाठून अकॅडमीचे संचालक ‎घुगे यांची भेट घेत जाब विचारला. तेव्हा मुलाने ‎‎आणखी एक धक्कादायक खुलासा केला. 7 जून ‎‎रोजी ‘टेरेसवर सिगारेट का पितो?’ असा संशय ‎घेऊन ढाकणे याने त्याला टेरेसवर नेऊन बेदम ‎मारले होते, तसेच त्याचे पाय भिंतीला लावून‎ डोक्यावर उलटे उभे केले होते. आईने‎ अकॅडमीतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची ‎मागणी केली असता, हा सर्व छळ कॅमेऱ्यात कैद‎ झाल्याचे समोर आले. यानंतर छावणी पोलिस‎ ठाण्यात तक्रार देण्यात आली. सहायक पोलिस ‎निरीक्षक यांच्या मार्गदर्शना खाली हवालदार रवींद्र‎ देशमुख या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.‎ ‎वडिलांपासून विभक्त, खाकीचे स्वप्न घेऊन संघर्ष‎ पीडित मुलाचे आई-वडील विभक्त राहतात. आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुलाच्या शिक्षणाची ‎जिम्मेदारी पेलली आहे. आई व मुलाचे एकच स्वप्न आहे – ‘खाकी वर्दी’. आपल्या जिल्ह्यापासून दूर ‎राहून हा मुलगा अकॅडमीत प्रचंड मेहनत घेत होता. या अमानुष मारहाणीमुळे त्याच्या मनात प्रचंड‎ भीती भरली आहे. मात्र, ‘पोलिस होण्याचा निश्चय ढळू देणार नाही’ हा त्याचा बाणा कायम आहे.‎ 30 हजार शुल्क अन् महिन्याला 4 ‎हजार वेगळे, तरी अन्न कण महागात‎ सध्या शहरात पोलिस व सैन्य भरती अकॅडमींचे पेव‎फुटले आहे. सकाळच्या सत्रात लवकर सराव करता‎ यावा म्हणून विद्यार्थी येथेच निवास करतात. या‎ अकॅडमीत राहण्यासाठी वार्षिक 30 हजार रुपये ‎शुल्क घेतले जाते. याशिवाय वसतिगृह व मेससाठी ‎दरमहा 4 हजार रुपये वेगळे मोजावे लागतात.‎ पालकांकडून हजारो रुपये उकळल्यानंतरही केवळ‎‘जास्त जेवण घेतले’ म्हणून वाढत्या वयाच्या ‎मुलाला जनावरासारखे मारले जात असल्याने‎ पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.‎ भरती अकॅडमींच्या मनमानीवर ‎प्रशासनाच्या नियंत्रणाची गरज‎ छत्रपती संभाजीनगर हे स्पर्धा परीक्षा व पोलिस‎भरतीचे केंद्र बनत आहे. मात्र, ग्रामीण‎ भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून जादा शुल्क ‎वसूल करणे, त्यांना डांबून ठेवणे, त्यांच्यावर‎ मानसिक व शारीरिक अत्याचार करणे असे‎ प्रकार वाढले आहेत. या अकॅडमींमध्ये ‎विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे ऑडिट होणे गरजेचे‎ आहे. शिस्तीच्या नावाखाली चालणाऱ्या‎ दादागिरीचेही ऑडिट व्हावे, अन्यथा ‎विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येईल.‎

Leave a Comment

error: Content is protected !!