पडेगाव येथील ‘भारत करिअर अकॅडमी” या पोलिस भरती अकॅडमीमध्ये शिकणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याला मेसमध्ये जास्तीचे जेवण घेतल्याच्या क्षुल्लक कारणावरून रबरी पाइप, बेल्ट व काठीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एवढेच नव्हे, तर क्रूरतेची सीमा ओलांडत विद्यार्थ्याला भिंतीला पाय लावून उलटे उभे राहण्याची अमानुष शिक्षा देण्यात आली. याप्रकरणी क्लासेसचा व्यवस्थापक तथा पीटीशिक्षक विवेक ढाकणे याच्या विरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगा हा मूळचा बुलढाणा येथील रहिवासी आहे. तो गेल्या वर्षीच्या जून महिन्यापासून पडेगाव येथील भारत करिअर अकॅडमीत पोलिस भरतीचे प्रशिक्षण घेत आहे. मंगळवारी (9 जून) मेसमध्ये जास्तीचे जेवण घेतल्याने शिक्षक विवेक ढाकणे याने त्याला अमानुषपणे मारहाण केली. घाबरलेल्या मुलाने 9 जून रोजीच आपल्या आईला फोन करून या छळाची माहिती दिली. फिर्यादी आईने तातडीने छत्रपती संभाजीनगर गाठून अकॅडमीचे संचालक घुगे यांची भेट घेत जाब विचारला. तेव्हा मुलाने आणखी एक धक्कादायक खुलासा केला. 7 जून रोजी ‘टेरेसवर सिगारेट का पितो?’ असा संशय घेऊन ढाकणे याने त्याला टेरेसवर नेऊन बेदम मारले होते, तसेच त्याचे पाय भिंतीला लावून डोक्यावर उलटे उभे केले होते. आईने अकॅडमीतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केली असता, हा सर्व छळ कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समोर आले. यानंतर छावणी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शना खाली हवालदार रवींद्र देशमुख या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. वडिलांपासून विभक्त, खाकीचे स्वप्न घेऊन संघर्ष पीडित मुलाचे आई-वडील विभक्त राहतात. आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुलाच्या शिक्षणाची जिम्मेदारी पेलली आहे. आई व मुलाचे एकच स्वप्न आहे – ‘खाकी वर्दी’. आपल्या जिल्ह्यापासून दूर राहून हा मुलगा अकॅडमीत प्रचंड मेहनत घेत होता. या अमानुष मारहाणीमुळे त्याच्या मनात प्रचंड भीती भरली आहे. मात्र, ‘पोलिस होण्याचा निश्चय ढळू देणार नाही’ हा त्याचा बाणा कायम आहे. 30 हजार शुल्क अन् महिन्याला 4 हजार वेगळे, तरी अन्न कण महागात सध्या शहरात पोलिस व सैन्य भरती अकॅडमींचे पेवफुटले आहे. सकाळच्या सत्रात लवकर सराव करता यावा म्हणून विद्यार्थी येथेच निवास करतात. या अकॅडमीत राहण्यासाठी वार्षिक 30 हजार रुपये शुल्क घेतले जाते. याशिवाय वसतिगृह व मेससाठी दरमहा 4 हजार रुपये वेगळे मोजावे लागतात. पालकांकडून हजारो रुपये उकळल्यानंतरही केवळ‘जास्त जेवण घेतले’ म्हणून वाढत्या वयाच्या मुलाला जनावरासारखे मारले जात असल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. भरती अकॅडमींच्या मनमानीवर प्रशासनाच्या नियंत्रणाची गरज छत्रपती संभाजीनगर हे स्पर्धा परीक्षा व पोलिसभरतीचे केंद्र बनत आहे. मात्र, ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून जादा शुल्क वसूल करणे, त्यांना डांबून ठेवणे, त्यांच्यावर मानसिक व शारीरिक अत्याचार करणे असे प्रकार वाढले आहेत. या अकॅडमींमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे ऑडिट होणे गरजेचे आहे. शिस्तीच्या नावाखाली चालणाऱ्या दादागिरीचेही ऑडिट व्हावे, अन्यथा विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येईल.
