तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा कायम असून, आज करंजी व शिरपूर परिसरात पुन्हा जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतीपिकांसह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. करंजी व शिरपूर परिसरात दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरील टिनपत्रे उडून गेली तर काही घरांच्या भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. अचानक आलेल्या या संकटामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. वादळाचा फटका वाहनांनाही बसला असून, काही मोटारसायकली तसेच चारचाकी वाहने नुकसानग्रस्त झाली आहेत. झाडांच्या फांद्या तुटून वाहनांवर पडल्याने नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला होता. दरम्यान, शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचेही नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे पिके आडवी पडली आहे. भाजीपाला व फळबागांना फटका बसला आहे. सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.