39 ठिकाणी बोरवेल अधिग्रहित; चार गावांना टँकरने पाणीपुरवठा:मारेगाव तालुक्याला बसतेय पाणीटंचाईची झळ‎

उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने मारेगाव तालुक्यावर पुन्हा एकदा पाणीटंचाईचे संकट गडद होऊ लागले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची चिन्हे दिसू लागली असून, नागरिकांना उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. विशेषतः दुर्गम आणि आदिवासी भागातील कोलाम वस्त्यांमध्ये परिस्थिती अधिक बिकट होत असल्याचे चित्र समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन २३ गावे व १० कोलाम वस्त्यांसाठी ४३ योजनांचा समावेश असलेला कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यासाठी २३ लाख ६६ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली असून, विहिरी व बोरवेल अधिग्रहणासह टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. आराखड्यानुसार तालुक्यातील ३९ ठिकाणी विहिरी आणि बोरवेल अधिग्रहित करण्यात येणार आहेत. मे महिन्यात पाण्याची झळ अधिक तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन २९ गावांमध्ये ही उपाययोजना राबविण्यात येणार आहे. यामुळे टंचाईग्रस्त भागांना तात्पुरता दिलासा मिळण्याची अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच उमरीपोड, पांडविहीर, वसंतनगर आणि दुर्गाडा या चार गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची तरतूद करण्यात आली असून, यासंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे एप्रिल मधेच पाठविण्यात आला आहे. मंजुरी मिळताच तातडीने पाणीपुरवठा सुरू केला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, दरवर्षी लाखो रुपयांचे टंचाई आराखडे तयार होऊनही कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अनेक गावांतील नळयोजना अपुऱ्या ठरत असून, अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई भासत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे लहान प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि दीर्घकालीन जलसंधारण प्रकल्पांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडूनही पाणी अडविण्यासाठी आवश्यक धरणे, बंधारे आणि साठवण प्रकल्प अपुरे असल्याने मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी वाहून जात आहे. नळ योजना ठरतायत कुचकामी जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावाला शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने तालुक्यात १०४ ठिकाणी नळ योजनांची कामे सुरू करण्यात आली होती. मात्र यापैकी ५० टक्क्यांहून अधिक ठिकाणी कामे अद्यापही अपूर्ण असून अनेक योजना खोळंबलेल्या अवस्थेत आहेत. प्रकल्पांकडे होतेय दुर्लक्ष तालुक्यात नवरगाव येथे मध्यम प्रकल्प तर नरसाळा, शिवणाळा, महागाव, म्हैसदोडका यासह सुमारे पंधरा ठिकाणी लघु प्रकल्प अस्तित्वात आहेत. या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध असूनही संबंधित पाणीपुरवठा योजनांना अपेक्षित गती मिळत नसल्याचे चित्र आहे. या परिसरातील प्रलंबित योजनांना निधी उपलब्ध करून प्रभावीपणे राबविल्यास तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागू शकतो. मात्र या योजनांकडे सातत्याने होत असलेले दुर्लक्ष ग्रामीण विकासासाठी घातक ठरत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!