निरंतर ज्ञानयज्ञामुळे बालमनांवर होतेय सुसंस्कारांचे सुवर्णसिंचन:लहानग्यांच्या मुखातून उमटले संस्कृत श्लोक, गाैमातेचे केले कुतूहल‎

आधुनिकतेच्या या वेगवान युगात संस्कारांची संस्कृती जपणे हे आजच्या काळातील मोठे आव्हान ठरत आहे. अशा काळात वाशीम शहरात एक कौतुकास्पद, सकारात्मक क्रांती घडत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या, एमबीए पदवीधर संजना महेश अवस्थी यांनी आपल्या संवेदनशील भावनेतून ‘दत्तछंद संस्कार वर्ग’ हे संस्कारांचे नंदनवन फुलवले आहे. भावी पिढीला सुसंस्कारी, अध्यात्मप्रेमी, संवेदनशील बनवण्यासाठी त्यांनी घेतलेला हा वसा अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांच्या या निःशुल्क, निरागस, निरंतर ज्ञानयज्ञामुळे वाशिममधील बालमनांवर सुसंस्कारांचे सुवर्णसिंचन होत आहे. या वर्गात दररोज ५ ते १६ वयोगटातील ३० पेक्षा अधिक मुलांची उपस्थिती असते. संजना अवस्थी यांच्या अथांग प्रयत्नांमुळे अवघ्या काही दिवसांतच लहानग्यांच्या मुखातून संस्कृत श्लोक, स्तोत्रांचे सात्त्विक सूर उमटू लागले आहेत. या वर्गाचे सौंदर्य वाढवताना त्यांनी मुलांना स्तोत्रपठणाचे महत्त्व, त्यामागील अर्थ अतिशय सोप्या भाषेत पटवून दिला आहे. ‘करदर्शन अन् प्रभात वंदन, प्रसन्न होते बालकांचे मन…’ या ओळींना सार्थ ठरवत मुले आता प्रातःकाळ वंदन श्लोक उत्तम रीतीने म्हणतात. “मुखी चालिसा हनुमंताची, दूर पळते भीती मनाची…” याप्रमाणे श्री हनुमान चालिसा पठणाने मुलांमध्ये अद्भुत ऊर्जेचा संचार होत आहे. तसेच, “व्यंकटेश स्तोत्राचे होता पठण, भक्तीरसात न्हाऊन निघते जीवन…” आणि “रामरक्षेचे कवच लाभता भारी, सुरक्षित होई पिढी ही सारी…” या सात्त्विक ओळींचा प्रत्यय मुलांच्या शुद्ध उच्चारांतून येतो. श्री व्यंकटेश स्तोत्र, श्री रामरक्षा स्तोत्र मुलांनी पूर्णपणे मुखोद्गत केले असून त्यांच्या उच्चारांमधील स्पष्टता, तेज थक्क करणारे आहे. संजना या केवळ पाठांतरावर भर देत नाहीत. त्या लॅपटॉपच्या माध्यमातून देवाच्या ॲनिमेटेड शॉर्ट स्टोरीज दाखवतात. मुले खेळत-हसत अध्यात्माची गोडी लावतात. धार्मिक कथांसोबतच पॉझिटिव्ह मॅनिफेस्टेशन म्हणजेच सकारात्मक विचारसरणी, भूतदया, वेदांची माहिती, धर्मशास्त्रांमधील विज्ञानाची सांगड त्या अत्यंत कौशल्याने घालतात. याचेच फलित म्हणून मुले आता कोणतीही सुट्टी न घेता वेळेच्या अर्धा तास आधीच क्लाससाठी यायला लागली आहेत. मुलांमध्ये झालेला आचार-विचारांचा हा बदल पालकांसाठी सुखावह ठरत आहे. मुले आता आपापसात खेळताना थँक्यू किंवा सॉरीऐवजी ‘जय श्री राम’चा गजर करतात. रोज सकाळी सूर्यनारायणाला अर्घ्य देणे, घरातील आई, वडील, बहीण, वडीलधाऱ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेणे, जेवणानंतर आईचे कृतज्ञतापूर्वक कौतुक करणे, हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. या संस्कारांच्या वर्गात अनेक बालके आपली उत्कृष्ट, अष्टपैलू चमक दाखवत आहेत. यामध्ये प्रामुख्याने अर्पिता रोहित कोकास, आरव धीरजसिंह चौहान, आयुष लखनसिंह ठाकूर, रणवीर उमेश यादव, आर्यन विलास इंगळे, आराध्या अजय शिंदे, दृष्टी विजयसिंह ठाकूर या मुलांचा समावेश असून त्यांनी प्रत्येक उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मुक्या प्राण्यांवर अथांग माया करणारी ही बालके आता रस्त्यावर गाय दिसताच धावत जाऊन तिचे लाड करतात. तिला चारा भरवतात. मुलांमधील ही भूतदया, संवेदनशीलता पाहून वाशिममधील पालकांचे डोळे सुखावले आहेत. केवळ धार्मिक शिक्षणच दिले जात नाही या उपक्रमाच्या माध्यमातून केवळ धार्मिक शिक्षणच दिले जात नाही. आपण जन्माला आल्यानंतर या सृष्टीचा, पर्यावरणाचा, प्राणी-पक्षीमात्रांच ा सांभाळ कसा करायचा, याचे व्यावहारिक धडे दिले जात आहेत. बालवयातच निसर्गप्रेम, पर्यावरण, प्राणिमात्रांवर दया करण्याचे संस्कार मिळाल्यामुळे ही मुले भविष्यात सुजाण नागरिक बनतील. यात शंका नाही. संजना अवस्थी यांनी वाशिम शहरात स्वतःहून लावलेले हे रोपटे भविष्यात संस्कारांचा महावृक्ष बनेल. असा विश्वास व्यक्त होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!