जे लोक आमचा पक्ष फुटणार अशी आवई उठवत आहेत, त्यांची शिवसेना हे नाव घेण्याचीही पात्रता नाही. हे पळपुटे लोक आम्हाला काय शिकवणार? अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ..तर यासोबतच त्यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत एक मोठे विधान केले आहे. संजय राऊत म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर पडून राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला पाहिजे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र आणि देशाला एक मोठी राजकीय दिशा दिली होती. आजच्या घडीला त्यांचे तेच विचार आणि भूमिका पुढे नेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हातात हात घेऊन एकत्र येण्याची अत्यंत गरज आहे. दोन्ही भावांनी आपले वैयक्तिक आणि प्रादेशिक मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत. बाळासाहेबांचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांनी एकत्र येत देशाच्या पातळीवर मराठी पाऊल खंबीरपणे पुढे टाकले पाहिजे, असे आवाहनही राऊत यांनी केले. संजय राऊत म्हणाले की, आम्ही ऑपरेशन लांडगा करणार आहोत. जे सर्व लांडगे महायुतीमध्ये गेले. वाघाचा अपमान का करता आहात, तो राष्ट्रीय प्राणी आहे. शिवसेनेच्या खासदारांची ही काही पहिली बैठक नाही, शिवसेना स्थापन होऊन 60 वर्षे झाली आहेत. बैठकीवर टीका करणारे लोकं मुर्ख आहेत. आम्ही आमच्या लोकप्रतिनिधींना बोलवायचे नाही का? अमित शहा यांची सत्ता गेल्यावर या लोकांच्या चड्या खाली येतील. तुमचे बाहेर पडणं अवघड होईल. हिंमत असेल तर मराठी माणसांना त्रास देणाऱ्या अदानीसमोर उभे रहा.
गुंडांच्या मदतीने दहशतनिर्माण करण्याचा प्रयत्न संजय राऊत म्हणाले की, गौतम आदानीच्या कंपनीचे गुंड धारावीमध्ये मराठी माणसांच्या जागा रिकाम्या करण्यासाठी जोर जबरदस्ती चालवली आहे. आम्ही यावर बोलायचे नाही का? देवेंद्र फडणवीस आहेत कुठे? असा सवाल राऊत यांनी केला आहे. माजी आमदारांना त्रास दिला जात असेल तर सामान्य माणसांची काय परिस्थिती असेल? गुंडांच्या मदतीने दहशतनिर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे हे गुंड कुठून आणले याचे उत्तर गौतम अदानी यांनी दिले पाहिजे. त्यांची कंपनी जर या लेव्हलवर आली असेल तर मराठी माणसाबरोबर सरळ टक्कर होईल. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी 106 जणांनी प्राण दिले आता 1006 जण प्राण देतील हे अदानींनी लक्षात ठेवावे. बाबूराव माने यांनी माझ्याकडे येऊन या विषयाबद्दल संपूर्ण माहिती दिली. ..तर भाजप नगरसेवकांनी राजीनामा द्यावा संजय राऊत म्हणाले की, भाजपचे जर कोणी मराठी नगरसेवक निवडून आले असतील तर धारावीच्या मुद्यावर निषेध म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. धारावीत जात त्यांनी काय परिस्थिती आहे ते पाहिले पाहिजे. मी जर भाजपच्या नगरसेवकांना आवाहन केले आहे तर मनसे तर मराठी माणसांचाच पक्ष आहे ना. मुंबई विमानतळ गुंडाच्या ताब्यात संजय राऊत म्हणाले की, मुंबई विमानतळ काही गुंडाच्या ताब्यात दिले आहे. तिथे सोने तस्करीचे काही प्रकार समोर आले आहेत. त्यासाठी शिवसेनेला दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. उद्या दुपारी 2 वाजता या संदर्भात आम्ही विमानतळावर जाणार आहोत.
