रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन मागे:गिरीश महाजनांची शिष्टाई यशस्वी; अधिवेशनाच्या आधी चर्चेचे सरकारचे आश्वासन

राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’तील जाचक अटी रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात पुकारलेल्या ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन सुरू असून, दिवसेंदिवस या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. मात्र, तिसऱ्या दिवशी रोहित पवार यांची प्रकृती काहीशी खालावल्याची माहिती समोर आली आहे. भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी जाऊन रोहित पवारांची भेट घेतली. यावेळी रोहित पवारांनी जीआरमध्ये ज्या काही अटी आहेत त्या शिथिल तसेच काढून टाकण्याची मागणी केली आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्यांची 50 हजारांची अट काढून टाका अशी मागणी देखील पवारांनी केली आहे. तसेच या अटी काढा नाहीतर अहिल्यादेवी होळकरांच्या नावाचा अपमान होईल, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. यावेळी गिरीश महाजन यांनी सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शेतकरी कर्जमाफीमधील अटींच्या बाबतीत काय करता येईल यावर चर्चा केली जाईल, अशी ग्वाही महाजन यांनी दिली आहे. गिरीश महाजन म्हणाले, आमदार रोहित पवार हे गेल्या 3 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. मला त्यांचा कॉल आला आणि तेव्हा मी विचारले तेव्हा विचारले की हा सल्ला कोणी दिला? कारण मी देखील उपोषण केले होते. उपोषणाच्या भानगडीत पडायचे नाही, असे माझे मत आहे. पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले, आता मागणी नसताना देखील आम्ही शेतकरी कर्ज माफी केली. निवडणुकाही नव्हत्या, तरी आम्ही हा निर्णय घेतला. नेमलेल्या समितीने अभ्यास करून हा निर्णय घेण्यात आला आहे. पण रोहित दादांना असे वाटत आहे की यात सुधारणा झाली पाहिजे. त्यांच्या मागण्या आल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर या निकषावर पोहोचलो की चर्चा करावी लागेल. असे होणार नाही की इथे बसल्या बसल्या झाले आणि दिले. शासन सर्वांना मदत करत आहे. उपोषण सोडावे, गिरीश महाजन यांची विनंती आता शेतकरी अडचणीत आहे हे वस्तुस्थिती आहे त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. तरी यात सुधारणा पाहिजे असे रोहित पवारांना वाटत आहे. मी म्हणेल तुम्ही मुंबईला या आपण सविस्तर चर्चा करू. 22 तारखेपासून अधिवेशन आहे. 22 च्या आधी आपण एकदा बसून चर्चा करू. शेवटी मुख्यमंत्री साहेब योग्य तो निर्णय घेतील आणि मार्ग निघेल. उपोषण करून प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे आपण जास्त वेळ न बसता उपोषण सोडावे. रोहित पवार मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेसाठी तयार यावर रोहित पवार म्हणाले की, मला फक्त सगळ्या शेतकरी बांधवांना एकच विचारायचे आहे की, हे आंदोलन राजकीय नव्हते. आपण शेतकऱ्यांसाठी बसलो आहोत. कृषिमंत्री साहेबांनी देखील आपल्याला ग्वाही दिली आहे, गिरीश महाजन देखील आत्ता आपल्याला बोलले आहेत. पण मला असे वाटते की यात अजून ओढाताण केली तर शेतकऱ्यांचे नुकसान आहे. अधिवेशनाच्या आधी आपण चर्चा करूया. मला असे वाटत आहे की यातून दोन्ही अटी काढल्या जातील. मी सरकारला आग्रह करेल की आमच्या मागण्या मान्य कराच. जर सरकार याबाबतीत बैठक घ्यायला तयार असेल तर मग आपण चर्चेला मुख्यमंत्र्यांकडे जायचे का? असा सवाल पवारांनी आंदोलकांना व शेतकरी बांधवांना विचारला, त्यावर शेतकऱ्यांनी होकार उत्तर दिले. त्यानंतर रोहित पवारांनी सरकारचे आभार व्यक्त केले. मनोज जरांगे आंदोलनस्थळी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी रोहित पवार यांचे आंदोलनस्थळी भेट दिली. तसेच रोहित पवारांसोबत त्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर चर्चा देखील केली. सरकार शेतकऱ्यांचा आकडा हळू हळू कमी करत असल्याची माहिती पवारांनी जरांगे यांना दिली. यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, या देशातल्या, या राज्यातल्या बळीराजासाठी आपल्या पांडुरंगाच्या नगरीत संघर्ष सुरू आहे. नक्कीच शेतकऱ्याला न्याय तर मिळालाच पाहिजे. शेतकरी राजा आपला एकवटला आहे. कारण शेतकरी वाचला तर आपण वाचणार आहेत. कर्जमाफीच्या जाचक अटी जोपर्यंत सरकार पूर्णपणे हटवत नाही, तोपर्यंत आपण एक पाऊलही मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा रोहित पवार यांनी घेतला आहे. सततच्या अन्नत्यागामुळे तिसऱ्या दिवशी आमदार रोहित पवार यांच्या शरीरावर परिणाम जाणवू लागला आहे. वैद्यकीय तपासणीत त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी कमी झाली आहे, तर रक्तदाब सध्या स्थिर आहे. ठोस आश्वासनाशिवाय सरकारवर विश्वास नाही! आंदोलनस्थळावरून रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस सरकारला थेट इशारा दिला आहे. “गेल्या तीन दिवसांपासून शासनाकडून आणि कृषीमंत्र्यांकडून चर्चेच्या फेऱ्या आणि निमंत्रणे येत असली, तरी केवळ पोकळ शब्दांवर आमचा विश्वास नाही. जोपर्यंत मुख्यमंत्री किंवा सरकार अधिकृतपणे या जाचक अटी रद्द करत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,” असे रोहित पवार म्हणालेत. पवार कुटुंबाची शिकवण “मी मोठ्या राजकीय कुटुंबातील असलो तरी, पवार साहेबांनी (शरद पवार) आम्हाला सर्वसामान्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढण्याची शिकवण दिली आहे. आज माझ्या आंदोलनामुळे माझी आई, पत्नी आणि मुले चिंतेत आहेत. ते आज माझी भेट घेण्यासाठी पंढरपुरात येत आहेत.” तुमचं सरकार आणा अन् कर्जमाफी द्या, सामान्य महिलेचा सल्ला दरम्यान, कल्याण येथील एक महिला अधिक मासानिमित्त पंढरपून येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी आली असता, त्यांनी थेट आंदोलनस्थळी पोहोचून रोहित पवारांना सरकारची अडवणूक न करण्याचा आणि स्वतःचे सरकार आल्यावर पूर्ण कर्जमाफी देण्याचा जाहीर सल्ला दिला. या महिलेने थेट रोहित पवारांच्या उपोषणावरच सवाल उपस्थित केल्याने आंदोलनस्थळी काही काळ एकच सन्नाटा पसरला होता. ती महिला म्हणाली, “ शेतकऱ्यांना मदत केलीच पाहिजे. पण त्यांना सारखी कर्जमाफीची सवय लागते. रोहित पवारांना माझे असे आवाहन आहे की, तुम्ही तुमचे सरकार येईल यासाठी प्रयत्न करा. तुमचे सरकार आले की, शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी द्या. सध्या सरकार आर्थिक अडचणीत आहे हे त्यांना चांगले माहीत आहे, तरी तुम्ही आंदोलन करत आहात हे चुकीचे आहे.” “रोहित पवार चांगले ठणठणीत दिसत आहेत. त्यांनी अन्नत्याग केलाय असे वाटत नाहीयेआम्ही कुठल्याच पक्षाचे नसून सर्वसामान्य नागरिक आहोत. पण आता सरकारची अडवणूक होत आहे. असेही संबंधित महिला म्हणाली. दिग्गज नेते आंदोलनस्थळी दाखल होणार आज आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी राज्यभरातून विविध पक्षांचे दिग्गज नेते रोहित पवारांच्या भेटीसाठी पंढरपुरात दाखल होत आहेत. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते खासदार संजय राऊत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, महादेव जानकर, शशिकांत शिंदे आणि काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे देखील आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत. जरांगे पाटलांच्या समर्थकांनी आधीच रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून, आज जरांगे पाटील प्रत्यक्ष आंदोलनस्थळी भेट देऊन रोहित पवारांची विचारपूस करणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सरकारला आजचा ‘अल्टिमेटम’; उद्या विठ्ठल मंदिराच्या पायरीवर आंदोलन आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला आजच्या दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. जर आज संध्याकाळपर्यंत शासनाने सकारात्मक निर्णय जाहीर केला नाही, तर उद्या (सोमवार) सकाळी ते पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या ‘संत नामदेव पायरी’ येथे जाऊन आपले आंदोलन अधिक तीव्र करणार आहेत. या इशाऱ्यामुळे आता राज्याचे गृहविभाग आणि स्थानिक प्रशासनाची धावपळ उडाली आहे. काय आहेत रोहित पवारांच्या मुख्य मागण्या? रोहित पवार यांच्या मते, सरकारच्या ३६ हजार ५८५ कोटी रुपयांच्या कर्जमाफी योजनेत अनेक तांत्रिक अटींमुळे लाखो शेतकरी वंचित राहणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी २०१९ च्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांना या योजनेत केवळ ₹५०,००० पर्यंतच मर्यादित ठेवण्याची अट रद्द करून सर्वांना सरसकट ₹२ लाखांची कर्जमाफी द्यावी. शेतकऱ्यांना पुढील वर्षांचे कर्ज भरण्याची सक्ती न करता प्रोत्साहनपर अनुदान थेट खात्यात जमा करावे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!