शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटी रद्द कराव्यात या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचे पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला आता कमालीचे राजकीय वळण मिळाले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि माळशिरस तालुक्याचे पंचायत समिती सभापती दत्तात्रय मगर यांनी थेट आंदोलनस्थळी जाऊन रोहित पवारांना पाठिंबा जाहीर केला. मात्र, यावेळी बोलताना त्यांनी “अजितदादांप्रमाणेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचाही घात होऊ शकतो,” असे अत्यंत खळबळजनक वक्तव्य केल्याने महायुतीसह संपूर्ण राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे गटाचे अधिकृत पदाधिकारी असूनही दत्तात्रय मगर यांनी थेट आपल्याच सरकारमधील मित्रपक्षांवर संशय व्यक्त केला आहे. आंदोलनस्थळी बोलताना मगर म्हणाले, “मी सध्या सत्ताधारी सरकारमध्ये आहे, हे मान्य आहे. पण अजितदादांसोबत काय झाले, हे आज संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. शेतकऱ्यांचा एक मोठा कैवारी असणारे अजित पवार आपल्यामधून कसे हिरावले गेले, हे सर्वांनी पाहिले आहे. आता आपल्याला या दुसऱ्या कैवाऱ्याला (रोहित पवार) जपायचे आहे. मला सर्वात मोठी खंत वाटते ती म्हणजे आपले नेते एकनाथ शिंदे साहेबांची! अजितदादा जसे गेले, तसेच शिंदे साहेबांचाही अंतर्गत राजकीय घातपात केला जाऊ शकतो, अशी दाट शक्यता मला वाटतेय.” सत्ताधारी पक्षाच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याने उपमुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत आणि राजकीय भविष्याबद्दल थेट जाहीर मंचावरून अशी शंका उपस्थित केल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. रोहित पवारांच्या आंदोलनाला दत्तात्रय मगर यांचा पाठिंबा दरम्यान, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतची सरसकट कर्जमाफी जाहीर केली आहे. मात्र, यामध्ये एक अट घालण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज दोन लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना दोन लाखांवरील उर्वरित सर्व रक्कम आधी बँक खात्यात एकरकमी भरावी लागणार आहे, तरच त्यांना सरकारच्या दोन लाखांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. सरकारने लावलेली ही जाचक अट तातडीने रद्द करावी आणि शेतकऱ्यांना थेट दिलासा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी रोहित पवार पंढरपुरात विठ्ठलाच्या चरणी अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे पदाधिकारी आणि माळशिरस तालुका पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय मगर यांनी थेट रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी जाऊन या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या संदर्भात केलेल्या एका मोठ्या विधानामुळे महायुतीत वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
