Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

गावात सुविधा नाहीत, प्रसुतीसाठी जंगलातून 6 किमी पायपीट:बाळ पोटातच दगावले, मातेचाही करुण अंत; गडचिरोलीतील हृदयद्रावक घटना

विकसित भारत आणि प्रगत महाराष्ट्राच्या गप्पा मारल्या जात असताना, गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यात राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. या ठिकाणी एका मातेला प्रसूतीसाठी रस्ते आणि डॉक्टरांच्या अभावी आपला प्राण गमवावा लागला आहे. आशा संतोष किरंगा (वय २४) या गर्भवती मातेने आपल्या पोटातील बाळाला वाचवण्यासाठी पतीसोबत ६ किलोमीटरची जंगलमय पायपीट केली, परंतु वेळेत उपचार न मिळाल्याने आधी बाळाचा पोटातच मृत्यू झाला आणि त्यानंतर काही वेळातच मातेनेही अखेरचा श्वास घेतला. यासंबंधीच्या वृत्तानुसार, एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला गावात राहणाऱ्या आशा किरंगा नऊ महिन्यांच्या गर्भवती होत्या. गावात कोणतीही प्रसूती सुविधा उपलब्ध नव्हती. ऐनवेळी प्रसववेदना सुरू झाल्या तर दवाखान्यात कसे पोहोचायचे, या भीतीने त्यांनी १ जानेवारी रोजी आपल्या पतीसोबत ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या पेठा (बहिणीचे गाव) येथे जाण्याचा निर्णय घेतला. हे अंतर त्यांनी घनदाट जंगलातून पायी पार केले. गर्भवतीच्या पोटातच दगावले बाळ! २ जानेवारीच्या मध्यरात्री आशा यांना तीव्र प्रसववेदना सुरू झाल्या. आशासेविकेच्या मदतीने त्यांना तातडीने हेडरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, तिथे तपासणी केली असता बाळ पोटातच दगावल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या धक्क्याने आणि वाढत्या रक्तदाबाने आशा यांची प्रकृती वेगाने खालावली आणि उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. मृत्यूनंतर शवविच्छेदनासाठी वणवण धक्कादायक बाब म्हणजे, मृत्यूनंतरही या मातेच्या नशिबी असलेली वणवण थांबली नाही. शवविच्छेदनासाठी बाळ आणि मातेचे शव हेडरी येथून मृतदेह एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला, परंतु तिथे स्त्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध नव्हते. त्यानंतर दोघांचे मृतदेह पुन्हा ४० किलोमीटर लांब असलेल्या अहेरी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. काल शुक्रवारी दुपारी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांना सुपूर्द करण्यात आला. मृत्यूनंतरही या मातेच्या वाट्याला आलेली वणवण पाहून नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेने संपूर्ण राज्य सुन्न झाले असून आदिवासी भागातील आरोग्य सेवेच्या चिंधड्या उडाल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. दुर्गम भागातील आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर या घटनेमुळे गडचिरोलीच्या दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या आरोग्याचा आणि दळणवळणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही गडचिरोली जिल्ह्यात रस्ता नसल्याने झोळीतून, कावड करून रुग्णांना रुग्णालयात नेण्यात आल्याचे अनेकदा समोर आले आहे. प्रगत महाराष्ट्रात आजही एका महिलेला प्रसूतीसाठी जंगलातून पायी प्रवास करावा लागतो आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे जीव गमवावा लागतो, ही बाब अत्यंत लाजिरवाणी ठरली आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!