पूरग्रस्त क्षेत्रातील 169 गावांत सतर्कता:साथरोग रोखण्यासाठी औषधसाठा, आरोग्य पथके तैनात‎

मान्सून काळात पूर, पाणी साचणे आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागाने विशेष खबरदारी घेतली आहे. जिल्ह्यातील पूरप्रवण व आरोग्यदृष्ट्या संवेदनशील अशा १६९ गावांची निवड केली आहे. तेथे विशेष आरोग्य यंत्रणा तैनात करण्यात आली असून, आवश्यक औषधसाठाही उपलब्ध करून देण्यात आला आहे. दरवर्षी नदीकाठच्या आणि दुर्गम भागातील गावांमध्ये अतिवृष्टीमुळे पाणी साचणे, दूषित पाणीपुरवठा आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. ही बाब लक्षात घेऊन आरोग्य विभागाने मान्सूनपूर्व नियोजन पूर्ण केले आहे. निवडलेल्या गावांमध्ये ताप, सर्दी, खोकला, अतिसार, उलट्या तसेच जलजन्य आजारांवरील औषधांचा पुरेसा साठा पाठवण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गावनिहाय परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी रॅपिड रिस्पॉन्स पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत. साथरोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत. यंत्रणा आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने बचाव मोहिमांसाठी ११ रेस्क्यू बोटी, १ हजार लाईफ जॅकेट्स आणि ८५० लाईफ रिंग्स सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. आरोग्यविषयक मदतीसाठी ५ हजार प्रथमोपचार किट्सचा साठा करण्यात आला आहे. रुग्ण व जखमींच्या स्थलांतरासाठी ३२० स्ट्रेचर उपलब्ध आहेत. याशिवाय ४० इमर्जन्सी टॉर्च आणि २ हजार ५०० अग्निशमन यंत्रे विविध ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!