शब्द पाळा, नाहीतर रस्त्यावरची मोठी लढाई:आंदोलन स्थगित करत रोहित पवारांचा सरकारला इशारा, 22 जूनपूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक निश्चित

शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आणि कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी पंढरपुरात सुरू केलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देत सरकारच्या वतीने शिष्टाई केली. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर रोहित पवार यांनी तिसऱ्या दिवशी आपले आंदोलन मागे घेतले. या आंदोलनाला राज्यभरातील शेतकरी आणि विविध संघटनांचा मोठा पाठिंबा मिळाला होता. अटी टाकणे हा अहिल्यादेवी होळकरांचा अवमान- पवार
ट्विट करत रोहित पवारांनी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, “सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांचे नाव दिले, परंतु त्यात अशा जाचक अटी टाकल्या ज्यामुळे बहुतांश शेतकरी वंचित राहणार होते. हा एकप्रकारे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचाच अवमान होता आणि हीच गोष्ट आम्ही आंदोलनातून सरकारच्या निदर्शनास आणून दिली. सुरुवातीला अटी बदलण्यास नकार देणारे सरकार आता या अटी काढण्यास तयार झाले, हेच या आंदोलनाचे मोठे यश आहे.” मंत्री गिरीश महाजनांची मध्यस्थी आणि मुख्यमंत्र्यांचा फोन
आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी मंत्री गिरीश महाजन यांनी पंढरपुरात आंदोलनस्थळी धाव घेतली. त्यांनी तिथूनच थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर संपर्क साधून चर्चा केली. आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी म्हणजेच २२ जूनपूर्वी मुंबईत विशेष बैठक घेतली जाईल आणि या बैठकीत कर्जमाफीतील जाचक अटीशर्ती काढून टाकण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन महाजन यांनी दिले. नामदेव पायरीवर महाआरती आणि उपोषणाची सांगता
सरकारकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर, महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या ‘नामदेव पायरी’ येथे महाआरती करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व उपोषणकर्ते, वारकरी, शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रोहित पवारांनी उपोषणाची औपचारिक सांगता केली. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत ‘बड्या’ नेत्यांचे शिष्टमंडळ
“शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहिले पाहिजे,” अशी भूमिका घेत रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीसाठी राज्यातील दिग्गज शेतकरी नेत्यांचे एक शिष्टमंडळ जाहीर केले आहे. यामध्ये राजू शेट्टी, शशिकांत शिंदे, कॉ. अजित नवले, वामनराव चटप, महादेव जानकर, प्रवीणदादा गायकवाड, रविकांत तुपकर आणि हर्षवर्धन सपकाळ या नेत्यांचा समावेश असणार आहे. शब्द पाळला नाही तर रस्त्यावरची मोठी लढाई- रोहित पवार
आंदोलन मागे घेण्याच्या निर्णयावर स्पष्टीकरण देताना रोहित पवार म्हणाले, “हे अन्नदात्यासाठीचे आंदोलन होते. आंदोलन अधिक ताणून धरले असते आणि हाती काही लागले नसते, तर राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असते; जे आम्हाला होऊ द्यायचे नव्हते. आता सरकारने विठुरायाच्या पवित्र भूमीत येऊन अटी काढण्याचा शब्द दिला आहे, ते तो पाळतील अशी अपेक्षा आहे. मात्र, बैठकीत सकारात्मक निर्णय झाला नाही, तर यापुढे रस्त्यावरची मोठी लढाई लढू, हा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.” शेवटी त्यांनी पाठिंबा देणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचे, शेतकऱ्यांचे आणि आपल्या कुटुंबाचे आभार मानले आहेत. राज्यभरातील आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा एल्गार:16 जूनपासून सेवा ठप्प होण्याची शक्यता; वाचा काय आहेत मागण्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी वारंवार दाद मागूनही प्रशासन केवळ वेळखाऊ धोरण राबवत असल्याचा आरोप करत, राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांनी आरपारच्या लढाईची घोषणा केली आहे. उद्यापासून (16 जून) राज्यभरातील आरटीओ कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा एल्गार पुकारला आहे. या संपामुळे राज्यातील वाहन परवाने, गाड्यांचे पासिंग, आरसी बुक यांसह आरटीओ कार्यालयातील बहुतांश सर्वच कामे ठप्प होण्याची शक्यता असून सर्वसामान्यांना फटका बसणार आहे. सविस्तर वाचा

Leave a Comment

error: Content is protected !!