जिथे काही वर्षांपूर्वी विवाहाच्या अक्षदा पडताना वयाचा विचार दुय्यम असायचा, त्याच पारनेर तालुक्यातील ऐतिहासिक आणि सामाजिकदृष्ट्या जागरूक करंदी गावाने बालविवाहाच्या अनिष्ट प्रथेला हद्दपार करण्याचा विडा उचलला आहे. आमच्या गावात आता एकही बालविवाह होणार नाही, उलट प्रत्येक मुलीच्या हाती शिक्षणाची पाटी असेल,’ असा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. ‘स्नेहालय’ संस्थेच्या ‘उडान’ प्रकल्पाच्या सोबतीने गावाने प्रत्यक्ष कृती आराखडा तयार केला आहे. गावातील अंगणवाडी सेविका गोरे, शेख व मनिषा चौधरी, आशा वर्कर्स आणि महिला बचत गटांच्या सदस्या आता गावात ‘जागल्या’ म्हणून काम करणार आहेत. गावात कुठेही लग्न ठरत असेल, तर सर्वात आधी मुलीच्या वयाची शहानिशा केली जाईल. लोकनियुक्त सरपंच नंदा भास्कर गव्हाणे आणि ग्रामसेवक यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष समिती लग्नपत्रिका आणि वयाचे दाखले तपासल्याशिवाय विवाह नोंदणी करणार नाहीत. लग्नाचे विधी करणाऱ्या स्थानिक पुरोहित, वाजंत्री प्रमुख, मंडप किंवा मंगल कार्यालय प्रमुख, स्वयंपाकी, यांनाही वधुवरांच्या वयाचा अधिकृत पुरावा पाहिल्याशिवाय लग्न न लावण्याची ताकीद दिली जाणार आहे. यामुळे मुलींचे शिक्षण अर्धवट न राहता उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढेल. माता मृत्यू आणि बाल मृत्यूच्या दरात घट होईल. तसेच मुलींचे आर्थिक सक्षमीकरण होईल, असा ग्रामस्थांना विश्वास आहे. जिल्ह्यात १,५८१ पेक्षा जास्त गावे आहेत. जिल्ह्यात बालविवाहाची समस्या पूर्णपणे संपवण्यासाठी स्नेहालय आणि जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून ‘बालविवाह मुक्त जिल्हा’ अभियान राबवले जात आहे. गेल्या २ ते ३ वर्षांत जनजागृतीमुळे रुईछत्तीशी गावाने स्वतःला बालविवाह मुक्त गाव घोषित केले आहे. तर १ हजार ३२१ गावांनी संकल्पाचे ठराव ग्रामसभांमध्ये मंजूर केले आहेत १,३२१ गावांचे संकल्प गावातील लेकींच्या उज्ज्वल भविष्याचा पाया ^ हा केवळ एक सामाजिक उपक्रम नाही, तर आमच्या लेकींच्या उज्वल भविष्याचा पाया आहे. त्यामुळे आता आम्ही कायद्याची वाट न पाहता स्वतःहून गावात कडक नियम लागू करणार आहोत. गाव बालविवाहमुक्त झाले तर, करंदी गाव संपूर्ण राज्याला दिशा देईल. – नंदा गव्हाणे, लोकनियुक्त सरपंच, करंदी, ता. पारनेर.
