हिंगोली लोकसभा मतदार संघातील ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या शिंदेसेनेतील स्वागताचे बॅनर झळकू लागले असून शहरातील सर्वाजनिक चौकांमधून आमदार संतोष बांगर यांनी बॅनर झळकवित जिल्हयाच्या विकासासाठी योग्य निर्णय घेतल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांमधून चांगलीच आग पाखड केली जात आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघाचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी लोकसभा निवडणुकीत शिंदेसनेचे बाबुराव कदम कोहळीकर यांचा पराभव करून हिंगोली जिल्हा ठाकरेगटाचा बालेकिल्ला असल्याचे दाखवून दिले. यावेळी मतदारांनीही आष्टीकर यांना भरभरून मतदान केले. त्यामुळे हिंगोली लोकसभेतील मतदारांना खासदर आष्टीकर यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मागील काहीदिवसांपासून ऑपरेशन टायगरने जोर पकडल्यानंतर खासदार आष्टीकर शिंदेसेनेत जाणार याची चाहूल ठाकरे गटांच्या नेत्यांना लागली होती. मात्र पत्रकार परिषदांमधून खासदार आष्टीकर यांनी यामध्ये कुठलेही तथ्य नाही आपण कुठेही जाणार नाही असे स्पष्ट केले होते. मात्र मागील दोन दिवसांपासून ते नॉट रिचेबल आहेत तर ठाकरे गटाच्या बैठकीला देखील त्यांनी दांडी मारली. त्यामुळे ते शिंदेसेनेत प्रवेश करतील किंवा वेगळा गट स्थापन करतील हे निश्चीत झाले होते. दरम्यान, मागील दोन दिवसांच्या राजकिय घडामोडी नंतर आज हिंगोली शहरात आमदार संतोष बांगर यांनी खासदार नागेश पाटील यांच्या स्वागताचे बॅनर झळकविले आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने योग्य निर्णय घेतल्या बद्दल आपले हार्दिक अभिनंदन असे यामध्ये नमुद केले आहे. या पोस्टरबाजीमुळे खासदार आष्टीकरांचा लवकरच शिंदेसेनेत प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे ठाकरेगटाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार आष्टीकरांच्या विरोधात आगपाखड सुरु केली आहे. सेनगाव व गोरेगाव येथे त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तर खासदार आष्टीकर गद्दाल निघाला त्यांना जायचे होते तर राजिनामा देऊन जायचे असते. तसेच असे कितीही खासदार गेले तरी आम्ही पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याच पाठिशी असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
