शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे हिंगोली जिल्हा दौऱ्यात सरकाराच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत कर्जमुक्तीसाठी मराठवाड्यात मंगळवारी ता. १६ सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली आहे,. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरण्यासाठी हे आंदोलन छेडले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हिंगोली येथे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची रविवारी ता. १४ बैठक झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेवर सडकून टीका केली. सरकारची कर्जमाफी नसून प्रत्यक्षात ‘कर्ज वसुली योजना’ आहे. सरकार सांगते की ठराविक रक्कम भरल्यानंतरच ५० हजार रुपये माफ होतील, अशा अनेक जाचक अटी यामध्ये घालण्यात आल्या आहेत. “उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही अटींशिवाय कर्जमुक्ती केली होती, मात्र विद्यमान सरकारने दिलेले ‘सातबारा कोरा’ करण्याचे आश्वासन पाळले नाही,” असा आरोप त्यांनी यावेळी केला. कर्जमुक्तीच्या प्रश्नावर मराठवाड्यातील आठही जिल्हयांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर तर छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त कार्यालयावर मंगळवारी ता. १६ ट्रॅक्टर मोर्चा काढला जाणार असल्याचे त्यांनी जाहिर केले. “नको अटी, नको शर्ती, आम्हाला हवी संपूर्ण कर्जमुक्ती” ही या आंदोलनाची मुख्य घोषणा (टॅगलाईन) असणार आहे. हे आंदोलन केवळ मराठवाड्यापुरते मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे; अपण केवळ मराठवाड्यासाठीच्या आंदोलनाची घोषणा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी निदर्शने आणि ‘रास्तारोको’ सारखी आंदोलने करण्यात आली होती. मात्र, आता शेतकऱ्यांच्या कष्टाचे आणि श्रमाचे प्रतीक असलेले ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्याचेही दानवे यांनी सांगितले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्याचा हा दौरा महत्त्वाचा आहे. हिंगोली जिल्हा हा शिवसेनेचा संघटनात्मकदृष्ट्या मजबूत जिल्हा असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाची बांधणी करणे हा या दौऱ्याचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
