Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

डिजिटल इंडियाच्या गप्पा अन् जीवघेणा प्रवास:वैनगंगेवरील ‘ईटान-कोलारी’ पूल 10 वर्षांपासून अधांतरीच; जीव मुठीत घेऊन प्रवास

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला, ‘डिजिटल इंडिया’च्या घोषणांनी आकाश दुमदुमले, पण भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वैनगंगा नदीकाठच्या जनतेचे नशीब आजही अंधारातच आहे. ईटान-कोलारी पुलाचे काम रखडल्याने, या भागातील नागरिकांना आजही नदीपात्रातून ‘डोंग्या’च्या (नावेच्या) साहाय्याने जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे, राज्याच्या राजकारणातील दोन दिग्गज नेत्यांचा हा बालेकिल्ला असूनही जनतेच्या यातना मात्र संपलेल्या नाहीत. ​भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरचे आमदार बंटी भांगडिया या दोन बड्या नेत्यांच्या मतदारसंघांना हा पूल जोडतो. ईटान हे नाना पटोले यांच्या मतदारसंघातील शेवटच्या टोकाचे गाव, तर कोलारी हे चिमूर मतदारसंघातील महत्त्वाचे गाव. राज्याच्या राजकारणात ज्या नेत्यांचा शब्द चालतो, त्यांच्याच गृहक्षेत्रात मात्र विकासाचा हा ‘पूल’ कागदावरच अडकला आहे. ​पाच वर्षांपासून कामाची कासवगती सन २०१८ मध्ये या भागाचे तत्कालिन आमदार बाळा काशिवार यांच्या पुढाकाराने तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुलाचे साकोलीतून ई भूमिपूजन करण्यात आले होते. माञ ​गेल्या पाच वर्षांपासून या पुलाचे बांधकाम संथ गतीने सुरू आहे. या रखडलेल्या कामामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. केवळ घोषणा आणि आश्वासनांच्या पलिकडे जाऊन प्रत्यक्ष जमिनीवर काम कधी पूर्ण होणार, असा सवाल जनसामान्यांतून विचारला जात आहे. ​व्यापार, शिक्षण आणि सोयरिकींवर परिणाम ​वैनगंगा नदीला पावसाळ्यात पूर आल्यावर या भागाचा संपर्क तुटतो. पूल नसल्यामुळे केवळ दळणवळणच थांबले नाही, तर त्याचे दूरगामी परिणाम स्थानिक जनजीवनावर झाले आहेत. विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना बाजारपेठेसाठी लांबचा वळसा घालावा लागतो. रस्ता नसल्यामुळे या भागातील गावांमध्ये सोयरीकी (लग्नसंबंध) जुळवण्यासही लोक नकार देत असल्याचे वास्तव समोर आले आहे. या भागाचे आमदार नाना पटोले यांना पुलाच्या संथगतीने होणाऱ्या कामाबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले ​”मी खासदार असताना केंद्र सरकारने या पुलासाठी १०० कोटी रुपये दिले होते. मात्र, त्यानंतर केंद्राने उर्वरित निधी थांबवल्यामुळे काम रखडले आहे. आजही नागरिकांना नावेतून प्रवास करावा लागतो ही खेदजनक बाब आहे.” तर ईटान येथील रहिवासी असलेले एक युवक संदीप मोटघरे याविषयी म्हणाले ​”पूल पूर्ण झाला तर हा सीमावर्ती भाग मुख्य प्रवाहात येईल. व्यापार, शिक्षण आणि दळणवळणासाठी हा मार्ग अत्यंत सोयीस्कर ठरणार आहे, पण सध्या केवळ प्रतीक्षाच नशिबी आहे.” चंद्रपुर जिल्ह्यातील कोलारी येथील ग्रामस्थ नेपाल हुमने यांनी सांगितले ​”पावसाळ्यात वैनगंगा दुथडी भरून वाहते, तेव्हा डोंग्यातून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे आहे. रस्ता नसल्याने अनेकदा मुला-मुलींच्या सोयरीकी तुटल्या आहेत. लोक आमच्या गावात यायला तयार नाहीत.” ​अधिवेशनात आवाज उठणार का..? ​नुकतेच राज्याचे अधिवेशन सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर, स्वतःला ‘विकासपुरुष’ म्हणवून घेणारे हे बडे नेते आपल्या हक्काच्या मतदारसंघातील या ‘जीवघेण्या’ प्रवासाची दखल घेणार का? की जनतेला यंदाचा पावसाळाही जीवावर उदार होऊनच नदी ओलांडावी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!