अधिकाऱ्यांवर योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी निश्चित:सीईओ सत्यम गांधींनी घेतला विकास योजनांचा आढावा

अमरावती जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचे उत्तरदायित्व संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी शनिवारी, सुटीच्या दिवशी विभागप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्रलंबित कामांचा निपटारा आणि नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून देण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत वेळेत आणि प्रभावीपणे पोहोचला पाहिजे, असे सीईओ गांधी यांनी नमूद केले. प्रत्येक विभागाने उद्दिष्टपूर्तीसाठी नियोजनबद्ध कार्यपद्धती अवलंबून प्रलंबित कामांचा तातडीने निपटारा करावा, असे निर्देश त्यांनी दिले. विकास कामांमध्ये गुणवत्ता, पारदर्शकता आणि गती या तीन बाबींना सर्वोच्च प्राधान्य देऊन नागरिककेंद्रित प्रशासनाची भूमिका अधिक सक्षम करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या १९ मे रोजी झालेल्या बैठकीनंतरची ही दुसरी आढावा बैठक होती, ज्यात विविध विभागांनी केलेल्या कामकाजाचा आणि साध्य केलेल्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मोदी आवास, प्रधानमंत्री आवास, रमाई आवास, शबरी आवास, पारधी आवास, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत तसेच संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृद्धी योजनेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत नवीन बचत गटांची स्थापना, पुनर्जीवित बचत गट, खेळते भांडवल, बँक कर्ज वितरण, लखपती दीदी व नमो ड्रोन दीदी योजनांच्या प्रगतीची समीक्षा करण्यात आली. तसेच, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ओडीएफ प्लस, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, एफएसएम आणि इतर निर्देशांकांबाबत चर्चा झाली. जल जीवन मिशनअंतर्गत ‘हर घर जल’, जलसेवा आकलन व पाणी गुणवत्तेचा आढावा घेण्यात आला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अपूर्ण कामे, घरकुलांचे सीसी, आधार ई-केवायसी, वेळेत मजुरी अदा करणे, मनुष्यदिन निर्मिती व रिक्त रोजगार सेवक पदांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. पंचायत विभागामार्फत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा विनियोग, कर वसुली, ग्रामपंचायत लेखा आक्षेप, चौकशी प्रकरणे आणि जनसुविधा कामांचा आढावा घेण्यात आला. शिक्षण विभागांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांमधील भौतिक सुविधा तसेच महिला व बालकल्याण विभागांतर्गत अंगणवाडी केंद्रांच्या पायाभूत सुविधांबाबतही चर्चा करण्यात आली. या बैठकीला सर्व विभागांचे खातेप्रमुख, गटविकास अधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. सीईओ सत्यम गांधी यांनी यावेळी सांगितले की, “आढावा बैठका केवळ आकडेवारीसाठी नसून प्रत्यक्ष परिणामकारक अंमलबजावणीसाठी आहेत. विभागांमधील समन्वय वाढवून प्रत्येक योजनेत अपेक्षित प्रगती साध्य करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करावे.”

Leave a Comment

error: Content is protected !!