फेट्रा येथील स्मशानभूमीची दहा गुंठे जमीन कधी हस्तांतरीत होणार:स्मशानभूमीची दुरवस्था, प्रशासनाचे दुर्लक्ष,ग्रामस्थांमध्ये नाराजी‎

फेट्रा गावातील स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. स्मशानभूमीच्या विकासाकरीता निधी मिळाला आहे. परंतु त्या निधीचा उपयोग झाला नाही, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. स्मशानभूमीसाठी दहा गुंठे जमीन दान देण्यात आली, अशी माहिती गावकऱ्यांना मिळाली आहे. ती दहा गुंठे जमीन स्मशान भूमीला कधी हस्तांतरीत होणार असा प्रश्न गावकऱ्यांनी विचारला आहे. याकडे मात्र ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सचिवाचे दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत माहिती अशी की, फेट्राची लोकसंख्या जवळपास पाच हजार आहे. त्या गावातून चाळीसगावात प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जाते. त्या ठिकाणी परिसरातील ग्रामस्थांसाठी सर्वात मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. गेल्या सहा दशकांपासून गावचा विकास मंदावलेला आहे. गावात ये जा करण्यासाठी रस्ता नाही. पाणीपुरवठ्याची व्यवस्था नाही. हिवळणी फाटा ते फेट्रा पर्यंतच्या रस्त्याचे थातुरमातुर सिमेंट कॉंक्रिटीकरण झाले आहे. पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये मोप रस्त्याला लागून स्मशानभूमी आहे. परंतु त्या स्मशानभूमीत मूलभूत सुविधा उपलब्ध नाही. स्मशानभूमीच्या विकासासाठी शासनाकडून अनुदान मिळाले आहे. ती अनुदानाची रक्कम स्मशानभूमीच्या विकासासाठी वापरलेली नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. स्मशानभूमीला तार कंपाऊंड नाही. प्रवेशद्वार नाही. जे आहे ते तुटलेल्या अवस्थेत आहे. चारही बाजूचे तार पूर्णपणे निकामी झाले आहे. परिसरात स्मशानभूमी परिसरात शेडचे बांधकाम झालेले नाही. शेडच्या बांधकामाकरीता निधी मिळून देखील बांधकाम झालेले नाही. अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या लोकांकरिता पाण्याची व्यवस्था नाही. अंत्यसंस्कार करण्यासाठी गावकऱ्यांना घरूनच हंडाभर पाणी आणावे लागते. एका दिवशी गावातील दोघांचा मृत्यू झाल्यास त्या ठिकाणी दुसरी व्यवस्था देखील नाही. बसण्याची व्यवस्था नाही. ग्रामपंचायतीमार्फत वृक्षाची लागवड देखील केलेली नाही. उन्हाळ्यात एखाद्याचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारकरिता आलेल्या लोकांना भर उन्हात अंत्यविधी उरकावा लागतो. ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातात त्या लोखंडी पोल तुटलेले आहे. स्मशानभूमीचा परिसर भकास झाला आहे. यासह अनेक महत्त्वाच्या व मुलभूत बाबींकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला मिळालेल्या निधीची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितावर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. पावसाळ्यात गावकऱ्यांचे हाल फेट्रा गावातील अंतर्गत रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. सर्वत्र मातीयुक्त रस्ता झाला आहे.यामुळे पावसाळ्यात गावकऱ्यांना ये जा करताना कमालीची कसरत करावी लागते. पावसाळ्यात अनेक दुचाकी वाहन घसरून पडल्यामुळे अपघात झाल्याच्या घटना देखील घडल्या आहे. गावामध्ये प्राधिकरणाचे शुद्धीकरण केंद्र असून, देखील गावांना दूषित पाणी मिळते. गावकऱ्यांना ते पाणी वापरावे लागत असून पिण्याकरिता जलशुद्धीकरण केंद्राच्या बाजूलाच असलेल्या विहिरी मधून पाणी आणावे लागते. त्यामुळे ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन गावातील अंतर्गत रस्ते दुरुस्त करावे, अशी मागणी गावकऱ्याकडून होत आहे. दहा गुंठे जमीन अनुदान केवळ तोंडीच स्मशानभूमीचा विस्तार करण्यासाठी गावातील एका नागरिकाने दहा गुंठे जमीन दान दिली आहे. त्या दहा गुंठ्याचा बोजा स्मशानभूमीच्या नावाने अजून पर्यंत चढलेला नाही. स्मशानभूमीला दान दिलेली दहा गुंठे जमीन परत कोणाला तरी दिल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. ती दहा गुंठे जमीन कोणाकडे गेली याचा शोध घेण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. गावाचा पाहिजे तसा विकास झालेला नाही आम्हाला ये-जा करण्यासाठी रस्ता नाही. स्मशानभूमीच्या निधीचे काय झाले आहे. स्मशानभूमीच्या ठिकाणी सुविधा नाही.अंत्यसंस्कार करतेवेळी आम्हाला अनेक वेळा मूलभूत सुविधा पासून मुकावे लागत आहे.त्यामुळे वरिष्ठांनी ग्रामपंचायतीकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा पंचफुला होडगीर यांनी व्यक्त केली. ठराव घेऊन निधीची मागणी करणार स्मशानभूमीच्या विकासासाठी येणाऱ्या सभेत ठराव घेणार आहे.त्या ठरावात स्मशानभूमीच्या विकासासाठी निधीची मागणी करणार आहे. स्मशानभूमीला जर दहा गुंठे जमीन मिळालेली असेल तर ती जमीन स्मशानभूमीच्या सातबारावर चढवण्यात येईल. संतोष डाखोरे, सचिव, ग्रामपंचायत फेट्रा.

Leave a Comment

error: Content is protected !!