उमरखेड जवळील मौजे सुकळी शिवारात गोवंश तस्करी रोखताना एका धाडसी गोरक्षकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण यवतमाल जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आरोपींवर मकोका अंतर्गत कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी महागाव तालुका तहसीलदार कार्यालयावर समस्त हिंदू समाज, गोरक्षक बांधवांच्या वतीने मोर्चा काढून मागणी करण्यात आले. २४ मे रोजी मौजे सुकळी (ता. उमरखेड) येथे गोवंश तस्करी होत असल्याचे पाहून गोरक्षक स्व. गजानन मारुती सुरोशे यांनी अत्यंत धैर्याने आणि गोसेवेच्या भावनेतून स्वतःचा जीव धोक्यात घालून तस्करांना रोखण्याचा प्रयत्न केला. ते एकटे असतानाही त्यांनी तस्करांचा सामना केला. मात्र, निर्दयी आणि क्रूर आरोपींनी त्यांच्यावर दगड व काठ्यांनी अमानुषपणे हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे परिसरात कमालीची दहशत आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ महागाव तालुक्यातील समस्त हिंदू समाज, गोरक्षक संघटना व नागरिकांच्या वतीने शांततापूर्ण मार्गाने मोर्चा काढून तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. सदर प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत, हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यात यावी, स्व. गजानन मारुती सुरोशे यांना “शहीद गोरक्षक’ घोषित करून त्यांच्या कुटुंबीयातील एका सदस्याला सरकारी नोकरी आणि किमान ५० लाख रुपयांची आर्थिक मदत तातडीने देण्यात यावी, महाराष्ट्र गोहत्या प्रतिबंधक कायद्याची संपूर्ण राज्यात कठोर व प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच अवैध गोवंश तस्करी तातडीने बंद करावी, गोरक्षकांना शासनाकडून विशेष सुरक्षा प्रदान करण्यात यावी. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जिल्हानिहाय विशेष नियंत्रण यंत्रणा आणि विशेष पथक स्थापन करण्यात यावे, अशी मागणी करून “स्व. गजानन सुरोशे यांचे बलिदान संपूर्ण हिंदू समाज कधीही विसरणार नाही. जर शासनाने या घटनेकडे गांभीर्याने पाहून तातडीने कठोर पावले उचलली नाहीत, तर समाजामध्ये कायदा व सुव्यवस्थेविषयी अविश्वास निर्माण होण्याची शक्यता आहे,’ असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या मोर्चात महागाव तालुक्यातील समस्त हिंदू समाज व गोरक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर निवेदन तहसीलदार अभय मस्के, नायब तहसीलदार गजानन पराते, महागाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार धनराज निळे यांनी स्वीकारले. या मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी महागाव पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जिल्हानिहाय विशेष नियंत्रण यंत्रणा आणि विशेष पथक स्थापन करण्यात यावे, अशी मागणी करून “स्व. गजानन सुरोशे यांचे बलिदान संपूर्ण हिंदू समाज कधीही विसरणार नाही. जर शासनाने या घटनेकडे गांभीर्याने पाहून तातडीने कठोर पावले उचलली नाहीत, तर समाजामध्ये कायदा व सुव्यवस्थेविषयी अविश्वास निर्माण होण्याची शक्यता आहे,’ असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.