प्रशासन सतर्क; नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, शेतकऱ्यांनाही विशेष सूचना
सुरेश पाचभाई मारेगाव
यवतमाळ, दि. ३० जुलै भारतीय हवामान विभागाने (IMD) विदर्भातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून, पुढील २४ ते ४८ तासांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणा सतर्क केल्या असून नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच महसूल, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होणे, रस्ते जलमय होणे, नद्या-नाले दुथडी भरून वाहणे तसेच वीज पडण्याच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
प्रशासनाने नागरिकांना पूरग्रस्त भाग, नद्या, नाले व ओढ्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. पुलांवरून किंवा रपट्यांवरून पाणी वाहत असताना ते ओलांडू नये, तसेच पूर पाहण्यासाठी अथवा सेल्फी काढण्यासाठी धोकादायक ठिकाणी गर्दी करू नये, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. पाणी साचलेल्या भागातील विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर व उघड्या विद्युत तारा यांच्यापासून सुरक्षित अंतर राखण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता केवळ जिल्हा प्रशासन आणि भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
शेतकऱ्यांनी घ्यावी विशेष काळजी
विजांचा कडकडाट सुरू झाल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ पक्क्या इमारतीत आश्रय घ्यावा. झाडाखाली उभे राहणे टाळावे. काढणीस आलेली पिके सुरक्षित ठिकाणी हलवावीत, साठवलेले धान्य पावसापासून सुरक्षित ठेवावे तसेच पूराचा धोका लक्षात घेऊन पशुधन उंच आणि सुरक्षित ठिकाणी हलवावे, अशा सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत.
दरम्यान, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी सर्व संबंधित विभागांना २४ तास सज्ज राहण्याचे आदेश दिले असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहून स्वतःची व कुटुंबाची सुरक्षितता जपण्याचे आवाहन केले आहे.