जानेवारी महिन्यात पार पडलेल्या चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही अंतर्गत गटबाजीमुळे महापौरपद गमावणाऱ्या काँग्रेसमधील वाद आता पूर्णपणे विकोपाला गेला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील अंतर्गत संघर्षाने आता उघड बंडाचे रूप घेतले आहे. धानोरकर गटाचे १६ नगरसेवक विद्यमान गटनेते राजेश अडूर यांना पदावरून हटवण्यासाठी थेट विभागीय आयुक्त कार्यालयात धाव घेणार आहेत. बहुमताच्या जोरावर नवीन गटनेता निवडण्याच्या या हालचालींमुळे चंद्रपूर काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. ६६ सदस्य संख्या असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेस पक्ष सर्वाधिक जागा जिंकून किंगमेकर ठरला होता. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र असल्याने काँग्रेसचाच महापौर बसणार हे निश्चित मानले जात होते. मात्र, निकाल लागल्याच्या पहिल्या दिवसापासूनच नवनिर्वाचित नगरसेवकांमध्ये खासदार धानोरकर आणि आमदार वडेट्टीवार असे दोन तट पडले आणि पक्षाची घसरण सुरू झाली. काँग्रेसने अवघ्या एका मताने महापौरपद गमावले महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे २७, भाजपचे २३, शिवसेना ठाकरे गटाचे ०६, शेकापचे ०३, वंचित बहुजन आघाडीचे ०२, तर अपक्ष ५ नगरसेवक निवडून आले होते. काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येऊनही पक्षामधील अंतर्गत गटबाजीचा थेट फायदा भाजपला मिळाला. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या संगीता खांडेकर यांनी काँग्रेसच्या उमेदवार सोनाली महाडूळे यांचा अवघ्या १ मताच्या फरकाने पराभव केला. हा पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागला होता. गटनेते राजेश अडूर यांच्याविरोधात अविश्वास महापौर निवडणुकीतील मानहानिकारक पराभवानंतरही दोन्ही गटांतील संघर्ष शमला नव्हता. काँग्रेसच्या एकूण २७ नगरसेवकांपैकी वडेट्टीवार गटाचे गटनेते राजेश अडूर यांच्या कार्यपद्धतीवर धानोरकर गट नाराज होता. अखेर धानोरकर गटाच्या १६ नगरसेवकांनी एकत्र येत अडूर यांच्याविरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे. खासदार धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली या नगरसेवकांनी समर्थक गटनेता बदलण्याचा ठरावही संमत केल्याची विश्वासार्ह माहिती सूत्रांनी दिली आहे. या ठरावाला कायदेशीर मंजुरी मिळवण्यासाठी हे १६ नगरसेवक आज विभागीय आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपले संख्याबळ सादर करणार आहेत. वरिष्ठांची मध्यस्थी ठरली होती अपयशी यापूर्वी मनपातील निवडीवेळी दोन्ही गटांतील वाद थेट पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचला होता. त्यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी स्वतः मध्यस्थी करत तात्पुरती मलमपट्टी केली होती. मात्र, स्थानिक पातळीवरील नेत्यांमधील विळ्या-भोपळ्याचे नाते बदलू शकले नाही. आगामी निवडणुका तोंडावर असताना चंद्रपूर काँग्रेसमधील हा उघड गृहकलह पक्षाला आगामी काळात मोठा फटका बसवू शकतो, अशी भीती राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.
