राज्यातील कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच, नंदुरबार तालुक्यातील सैताने येथील शेतकरी प्रमोद पाटील यांनी शासनाच्या कर्जमाफी धोरणाला फसवे ठरवत ‘सरसकट कर्जमाफी’च्या मागणीसाठी आजपासून थेट अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या या आक्रमक पावलामुळे प्रशासनासह संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सरसकट कर्जमाफी देण्याचे ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मी या विहिरीतून बाहेर येणार नाही आणि अन्नाचा एक कणही ग्रहण करणार नाही, असा इशारा प्रमोद पाटील यांनी विहिरीतूनच प्रशासनाला दिला आहे. हा संवेदनशील प्रकार सुरू असताना आंदोलन रोखण्यासाठी घटनास्थळी तैनात असलेल्या पोलिस आणि प्रशासनाच्या पथकाला आक्रमक गावकऱ्यांनी कडाडून विरोध केला. ज्यामुळे परिस्थिती अधिकच तणावपूर्ण होऊन पोलिस आणि गावकऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक आणि वाद उफाळून आल्याचे पाहायला मिळाले. सध्या पोलिस प्रशासन आणि महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी सैताने गावात तळ ठोकून असून, विहिरीत उतरून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याची समजूत काढून त्याला सुरक्षित बाहेर काढण्याचे आणि आंदोलन मागे घेण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने गावात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी तीन दिवस अन्नत्याग उपोषण देखील केले होते. त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांची समजूत काढली तसेच त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर पवारांनी त्यांचे उपोषण मागे घेतले. रविकांत तुपकरांचे बुलढाण्यात उपोषण रोहित पवारांच्या उपोषणानंतर आता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी देखील उपोषणाला सुरुवात केली आहे. 15 जून पासून रविकांत तुपकर यांनी बुलढाणा येथे उपोषणाला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आता आरपारच्या लढ्याचा एल्गार पुकारला आहे. आश्वासनांची फसवणूक, जाचक अटींची कर्जमाफी आणि पिकविम्याच्या नावाने सुरू असलेला अन्याय या विरोधात हा संघर्ष असल्याचे तुपकर यांनी म्हटले आहे. तसेच जीव गेला तरी बेहत्तर.. पण शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काचा पिकविमा मिळाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही, असेहीह त्यांनी स्पष्ट केले आहे.
