इचलकरंजी येथील श्री शिवतीर्थ मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास एक अत्यंत थरारक आणि भीषण अपघात घडला. एक भरधाव अनियंत्रित कार थेट बसस्थानकावरील प्रवाशांच्या गर्दीत घुसल्याने एका वृद्ध महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात अन्य पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर मुख्य चालकाने पळ काढला, मात्र काही वेळाने दुसऱ्याच एका तरुणाने ‘मीच कार चालवत होतो’ असा बनाव केल्याने उपस्थित जनसमुदाय प्रचंड संतप्त झाला आणि त्यांनी कारची तोडफोड करत तीव्र संताप व्यक्त केला. नंदा वसंत कोळी (वय ६५, रा. कुंभोज, ता. हातकणंगले) असे अपघातातील मृत महिलेचे नाव आहे. नंदा कोळी यांच्यावर काही दिवसांपूर्वीच बायपास शस्त्रक्रिया झाली होती. रुग्णालयातील नियमित वैद्यकीय तपासणी संपवून त्या कुंभोज येथे जाण्यासाठी बसस्थानकावर गाडीची वाट पाहत उभ्या होत्या. त्याच वेळी एमएच ४३ एएन २२२१ या क्रमांकाची भरधाव कार प्रथम बसस्थानकाच्या सुरक्षा कठड्याला धडकली आणि थेट प्रवाशांच्या अंगावर गेली. या कारने नंदा कोळी यांना इतकी भीषण धडक दिली की, त्या काही फूट फरफटत गेल्या आणि कारखाली चिरडल्या गेल्या. बसला धडकल्याने कार थांबली; प्रवाशांची पळापळ कार प्रवाशांना चिरडत पुढे जाऊन तिथेच फलाटावर उभ्या असलेल्या एका एसटी बसवर जोरात आदळली. कार बसवर आदळल्यामुळे बसमधील प्रवासीही हादरून गेले. दुपारी प्रवाशांची गर्दी नेहमीपेक्षा थोडी कमी असल्याने आणि कार येताना पाहून अनेकांनी प्रसंगावधान दाखवत पळ काढल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, अचानक झालेल्या या प्रकारामुळे बसस्थानक परिसरात काही काळ प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या अपघातात एसटी बसचे सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आदेश महावीर उपाध्ये (वय १९, रा. सांगली), बसव्वा नरसिंग इंगळे (वय ६७, रा. जवाहरनगर, इचलकरंजी), फरीदा झाकीरहुसेन शेख (वय ४६, रा. जवाहरनगर, इचलकरंजी) अशी अपघातातील जखमींची नावे असून, यांव्यतिरिक्त इतर दोन जखमींवर स्थानिक इंदिरा गांधी स्मृती (आयजीएम) रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खोट्या चालकाचा बनाव अन् जमावाचा रोष अपघात घडताच मूळ कारचालकाने प्रसंगावधान पाहून घटनास्थळावरून पोबारा केला. त्यानंतर काही वेळातच एक तरुण तिथे आला आणि “गाडी मीच चालवत होतो,” असा दावा करू लागला. मात्र, प्रत्यक्षदर्शींनी त्याचा हा खोटेपणा तात्काळ ओळखला. “मूळ चालकाला समोर आणा,” अशी मागणी करत संतप्त नागरिकांनी कारवर लाथा मारण्यास सुरवात केली, ज्यामुळे घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता. अपघातग्रस्त वाहनावर पोलिसांचा पट्टा, फलक आणि आतमध्ये पोलिस काठी मिळून आल्याने या कारचा नेमका मालक कोण? याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होत्या. संशयित चालकावर गुन्हा दाखल या अपघाताची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली असून संगीता विनोद कोळी यांनी याप्रकरणी अधिकृत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे संशयित चालक सतीश भीमराव कुराडे (रा. सुतार मळा) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
