संत साहित्य समाजाला दिशा देणारे अमूल्य वैभव- योगीराज महाराज:नांदखेड येथे एकनाथी भागवत पारायण सोहळ्याची भक्तिमय सांगता‎

चोहोट्टा बाजारजवळील नांदखेड येथे पुरुषोत्तम मासानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह, श्री एकनाथी भागवत सामूहिक पारायण सोहळा व कीर्तन महोत्सवाची रविवारी भक्तिमय वातावरणात सांगता झाली. संत साहित्य हे समाजाला दिशा देणारे अमूल्य वैभव असल्याचे संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांचे वंशज श्री योगिराज महाराज गोसावी म्हणाले. त्यांच्या काल्याच्या कीर्तनाने भाविकांना अध्यात्माची मेजवानी मिळाली. महोत्सावत हजारो वारकरी, शेतकरी व भाविकांच्या उपस्थितीत हरिनामाचा गजर दुमदुमला. गजानन महाराज येरोकार यांच्या मार्गदर्शनाखाली सात दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्यात दररोज काकडा, हरिपाठ, भागवत पारायण, प्रवचन, भजन व हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. संतवाणी, भागवत धर्माच्या विचारांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. सांगता सोहळ्यात काल्याच्या कीर्तनादरम्यान योगिराज महाराज गोसावी यांनी संत एकनाथ महाराजांच्या संत वाङ्मयाचे महत्त्व विशद केले. संत साहित्य हे समाजाला संस्कार, सदाचार, समता आणि मानवतेची शिकवण देणारे अमूल्य वैभव आहे.
संतांच्या विचारांचा प्रसार झाला तर समाजात शांतता, बंधुता आणि नैतिक मूल्यांची जपणूक होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले. लावूनी मृदुंग श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने या संतवचनाप्रमाणे संपूर्ण परिसरात टाळ-मृदुंगाच्या निनादात दिंडी, कीर्तन सेवा पार पडली. महोत्सवाअंतर्गत गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. वारकरी, युवक, महिला भगिनी आणि पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ग्रामस्थांच्या वतीने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची, निवासाची व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. धार्मिक, सामाजिक आणि आध्यात्मिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या सोहळ्यामुळे नांदखेड गावाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. सात दिवस चाललेल्या भव्य धार्मिक महोत्सवाची सांगता संतवाणी, हरिनाम, भक्तिभावाच्या वातावरणात उत्साहपूर्णरित्या उत्साहात पार पडले. उपस्थित भाविकांनी हा सोहळा आयुष्यभर स्मरणात राहील, अशा भावना व्यक्त केल्या.

Leave a Comment

error: Content is protected !!