बातमी ऐका (Marathi Voice Reader)
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या 9 खासदारांपैकी 6 खासदारांनी बंड केले आहे. या संपूर्ण घडामोडींमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नावाची विशेष चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत गंभीर दावा करत, ओमराजे निंबाळकर यांना पुण्यातून दिल्लीला नेण्यासाठी आमदार तानाजी सावंत यांनी पुढाकार घेतल्याचे म्हटले आहे. तसेच, या संपूर्ण घडामोडींची तयारी १० जूनलाच दिल्लीतील एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत करण्यात आल्याचाही दावा त्यांनी केला. पुण्यातून मध्यरात्री चार्टर्ड विमान आलं, तानाजी सावंत लीड करत होते शिवसेना उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत या संपूर्ण ‘ऑपरेशन’ची इनसाईड स्टोरी उघड केली. अंधारे म्हणाल्या, “खासदार ओमराजे निंबाळकर यांचा मुलगा रुग्णालयात दाखल असल्याने ते पुण्यात होते. मात्र, काल मध्यरात्री त्यांना दिल्लीला नेण्यासाठी पुण्यात खास चार्टर्ड विमान आले. महायुती सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत या संपूर्ण मोहिमेचे लीड करत होते. तानाजी सावंत, नानासाहेब पाटील, जयराजे निंबाळकर आणि ओमराजे निंबाळकर हे स्वतः त्या चार्टर्ड विमानातून दिल्लीला रवाना झाले. 10 जूनला दिल्लीतील हॉटेलमध्ये शिजला कट सुषमा अंधारे यांनी बंडखोरांच्या गुप्त बैठकीची तारीख आणि ठिकाण जाहीर करत खळबळ उडवून दिली. दिल्लीतील ‘हॉटेल मान्सून’मध्ये १० जून रोजीच या संदर्भात पहिली महत्त्वाची बैठक पार पडली होती. प्रत्येकाने आपापल्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि स्वार्थ पाहून हा निर्णय घेतला आहे. ओमराजे जर पक्षात नाराज नव्हते, तर ते स्वतः समोर येऊन आपली भूमिका का स्पष्ट करत नाहीत?” असा थेट सवाल अंधारेंनी केला. दुसऱ्यांची गॅरंटी कशी देऊ? ओमराजेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही, अशी माहिती अंधारेंनी दिली. त्यानंतर त्यांनी ओमराजेंचे खंदे समर्थक आणि सावलीसारखे सोबत असणारे आमदार कैलासदादा पाटील यांना फोन केला. त्यावर कैलास पाटील यांनी दिलेले उत्तर बरेच काही सांगून जाणारे आहे. पाटील अंधारेंना म्हणाले, “ताई, मी स्वतःची गॅरंटी देऊ शकतो, दुसऱ्यांची गॅरंटी मी कशी देऊ?” आमदार कैलास पाटलांच्या या संदिग्ध विधानामुळे ओमराजे निंबाळकर ठाकरे गटातून अधिकृतपणे बाहेर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. नाराज तानाजी सावंतांवर होती मोठी जबाबदारी विशेष म्हणजे, महायुती सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने आमदार तानाजी सावंत गेल्या काही काळापासून नाराज होते. मात्र, ‘ऑपरेशन टायगर’मध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना सोबत आणण्याची मोठी जबाबदारी सोपवली होती. तानाजी सावंतांच्याच मतदारसंघातून ओमराजेंनी लोकसभेला मोठी आघाडी घेतली होती, त्यामुळे सावंतांनी ही फिल्डिंग अचूक लावत ठाकरेंना त्यांच्या बालेकिल्ल्यातच मोठा सुरुंग लावला आहे. ठाकरेंचा पक्ष फुटला, राऊतांची पत्रकार परिषदेत शिवीगाळ:9 पैकी 6 खासदारांचा वेगळा गट, लोकसभा अध्यक्षांना सोपवले पत्र महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या (यूबीटी) नऊ खासदारांपैकी सहा खासदारांनी बंड केले आहे. सूत्रांनुसार, या सहा खासदारांनी बुधवारी सकाळी ९:३० वाजता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवून शिंदे गटाच्या शिवसेनेत विलीनीकरणाची विनंती केली आहे. सविस्तर वाचा