नरेश अरोरा यांना कॉन्ट्रॅक्ट मिळायलाच हवा, अशी काहींची भूमिका होती. मात्र, अजित दादांची कॉन्ट्रॅक्ट संदर्भात वेगळी भूमिका होती, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. मी कोणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नसल्याचे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे. तटकरे आरोरांच्या कॉन्ट्रॅक्ट साठी चर्चेला गेल्याचा अंदाज असल्याचे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे. मात्र या सर्व गोष्टींची लवकरात लवकर चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली. दादांना का उशीर झाला? हे मी बोलून दाखवले, दादा गाडीने गेले असते तरी दुर्घटना घडली नसती, असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा पक्ष हा एनडीए सोबत जाणार होता का? या संदर्भातल्या प्रश्नाला आपण सोमवारी किंवा मंगळवारी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत उत्तर देऊन स्पष्ट करेल, असं म्हणत रोहित पवार यांनी या उत्तरावर बोलणे टाळले. आम्हाला सत्तेत जायचे असते तर केव्हाच गलो असतो. मात्र विचारासाठी आम्ही संघर्ष करत आलेलो आहोत, असे देखील रोहित पवार यांनी स्पष्ट केले. मी कुठेही खोटं बोललेलो नसल्याचे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे. सोमवारी किंवा मंगळवारी जी पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे काय घडले? कुठे झाले? विरणीकरणावर कोण काय बोलले? या सर्व गोष्टींवर बोलणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितलं. गेल्या चार महिन्यापासून दादा एकटे पडल्यासारखे दिसत होते. देशपातळीवरचे आणि राज्यपातळीवरचे लोक त्यांच्यासोबत नव्हते. मात्र काही मोजके आमदार दादांसोबत होते. आजही तेच आमदार दादांच्या अपघाताबाबत बोलत असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. हा अपघात आहे की घातपात? हाच एक मुद्दा आज महत्त्वाचा आहे. सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार हे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना भेटले. त्यावेळी त्यांनी देखील अजित पवार यांच्या अपघाताचे कारण समोर आले पाहिजे, अशी मागणी केली असेल, असे आम्हाला वाटते, असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे. मोदी आणि शहा यांचा मला वेळ मिळाला नाही. मात्र अधिवेशन चालू असल्यामुळे काही नेते बिझी असतील. मात्र मी मेलच्या माध्यमातून माझे प्रश्न त्यांच्यासमोर मांडणार असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहेत. शेवटच्या क्षणी घेतलेला निर्णय संशयास्पद वाटतो रोहित पवार यांनी 27 आणि 28 जानेवारीदरम्यान घडलेल्या घटनांची साखळी मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार, जर अजितदादा 27 जानेवारीला पुण्याला कारने गेले असते, तर ते पुढील दिवशी बारामतीला पोहोचले असते आणि ही दुर्घटना टळली असती. मात्र त्या दिवशी झालेल्या बैठकीला उशीर झाला, काही महत्त्वाचे फोन आले आणि एका फाईलवर तातडीने स्वाक्षरी करण्याची मागणी झाली. दादांनी ती स्वाक्षरी केल्यानंतर संध्याकाळी 7.13 वाजता विमानाचे बुकिंग झाले, हा तपशील त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केला. रोहित पवार यांच्या मते, जर विमानाने जाण्याचा आधीच निर्णय झाला असता, तर 26 किंवा 27 तारखेलाच बुकिंग झाले असते. त्यामुळे शेवटच्या क्षणी घेतलेला निर्णय संशयास्पद वाटतो, असे ते म्हणाले. त्यांनी कोणावर थेट आरोप केला नसला तरी 27 ते 28 तारखेतील सर्व घटनांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली. विशेषत: प्रमुख पायलटने या काळात कोणाला भेटले, कोणाच्या संपर्कात होते, याचाही तपास व्हायला हवा, असे त्यांनी स्पष्ट केले. सुनील तटकरे यांची उपस्थितीही नमूद केली प्रमोदराव हिंदूराव यांनी दिलेल्या माहितीकडे लक्ष वेधत रोहित पवार म्हणाले की, 27 तारखेला सुनील तटकरे उशिरापर्यंत बैठकीत उपस्थित होते. त्याचवेळी प्रफुल्ल पटेल यांचा फोन आल्याची माहिती समोर आली. या दोन्ही गोष्टी जुळून येतात, असे ते म्हणाले. त्या बैठकीत एका पॉलिटिकल कन्सल्टन्सीबाबत चर्चा झाली आणि योगायोगाने त्याच कन्सल्टन्सीने विमान विकत घेतल्याची बाब त्यांनी मांडली. या कन्सल्टन्सीचा शेकडो कोटींचा करार रद्द करण्याबाबत अजित पवारांची भूमिका ठाम होती, असे रोहित पवार म्हणाले. कदाचित याच कारणावरून वाद झाला असावा, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. बैठकीला उशीर झाल्यामुळेच दादांनी कारऐवजी विमानाने जाण्याचा निर्णय घेतला, असा घटनाक्रम त्यांनी मांडला. या संदर्भात सुनील तटकरे यांची उपस्थितीही त्यांनी नमूद केली. ब्लॅक बॉक्स बंद असल्याचे समोर आले, तर नरेश अरोरा यांचे नावही रोहित पवार यांनी पुढे आणले. त्यांना फक्त सर्व्हेपुरते ठेवा, पक्ष कन्सल्टन्सीवर चालत नाही, असे अजित पवार म्हणत असत, असे त्यांनी सांगितले. बारामतीतील एका प्रसंगात दादांनी अरोरा यांच्या लोकांना झापल्याचा उल्लेखही त्यांनी केला. 27 तारखेच्या बैठकीत अरोरा यांच्या कराराबाबत काही नेते सकारात्मक होते, मात्र अजितदादा त्याच्या विरोधात होते, असा दावा त्यांनी केला. ब्लॅक बॉक्सबाबतही रोहित पवारांनी महत्त्वाचे विधान केले. काही विमान कंपन्या ब्लॅक बॉक्स बंद ठेवतात, अशी माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात जर या प्रकरणात ब्लॅक बॉक्स बंद असल्याचे समोर आले, तर संशय अधिक गडद होईल, असे ते म्हणाले.