‘मातोश्री’वर झालेल्या खासदारांच्या बैठकीत त्यांनी साईबाबा, आई भवानी, आई-मुलांच्या शपथा घेतल्या. मात्र, आता ते 50 कोटींसाठी विकले जात असतील, तर जनता हा तमाशा सहन करणार नाही. शिवसैनिकांनी रक्त आटवून निवडून दिले. ही बेईमानी खपवून घेणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी फुटलेल्या खासदांना मंगळवारी दिला. पत्रकार परिषदेत बोलताना खासदार संजय राऊत अत्यंत संतापलेले पाहायला मिळाले. ते म्हणाले, हे सर्व खासदार मशाल चिन्हावर, उद्धव ठाकरेंच्या नावावर आणि लाखो प्रामाणिक शिवसैनिकांच्या मेहनतीमुळे खासदार झाले आहेत. शिवसैनिकांनी दिवस-रात्र एक करून, स्वतःचे रक्त आटवून यांना निवडून दिले आहे. त्यामुळे या अशा पद्धतीने पक्षाशी बेईमानी करण्याचा अधिकार यांना कोणीही दिलेला नाही. ही निव्वळ डरपोकगिरी असून जनता आता हा तमाशा सहन करणार नाही. मातोश्रीवरच्या बैठकीत घेतल्या साईबाबा आणि मुलांच्या शपथा संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी ‘मातोश्री’वर झालेल्या खासदारांच्या बैठकीचा धक्कादायक अंतर्गत किस्सा उघड केला. “14 जून रोजी झालेल्या बैठकीला सर्व खासदार प्रत्यक्ष आणि ऑनलाईन उपस्थित होते. त्या बैठकीत एका खासदाराने तब्बल 5 वेळा साईबाबांची शपथ घेतली, दुसऱ्याने आई भवानीची तर एकाने स्वतःच्या पोटच्या मुलांची आणि आईची शपथ घेतली होती. बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगणारे हे खासदार जर आता 50 कोटी रुपयांच्या डीलसाठी विकले जात असतील, तर यांना जनता रस्त्यावर फिरू देणार नाही,” असा जळजळीत इशारा राऊत यांनी दिला. ऑपरेशन टायगर सोपं नाही- राऊत ज्यांना कुणाला आता सत्ताधाऱ्यांच्या गोटात जायचे असेल, त्यांनी आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग स्वतःच्या ताकदीवर निवडून येऊन दाखवावे, असे थेट आव्हान ठाकरे गटाने दिले आहे. राऊत यांनी स्पष्ट केले की, ‘ऑपरेशन टायगर’ करणे इतके सोपे नाही. पक्षाने या सर्व कायदेशीर बाबी लक्षात घेऊन तातडीने सर्व खासदारांसाठी अधिकृत व्हीप जारी केला आहे, तसेच दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही पक्षाच्या वतीने अधिकृत पत्र पाठवण्यात आले आहे. 50 कोटी रुपयांमध्ये डील झाली खासदार संजय राऊत यांनी काल रात्रीच्या घडामोडींचा खुलासा केला. काल रात्री 11 वाजेच्या सुमारास मला एका विश्वासू सूत्राने माहिती दिली की, महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्याची मोठी डील झाली आहे. प्रत्येकी 50 कोटी रुपयांना खासदारांना विकत घेतले जात असून, काल रात्रीच 15 कोटींचा ॲडव्हान्स दिला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मी ती लगेच सोशल मीडियावर जाहीर केली. हे सर्व खासदार ‘मशाल’ चिन्हावर आणि उद्धव ठाकरेंच्या मेहनतीवर निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना बेईमानी करण्याचा कोणताही अधिकार नाही. ज्यांना आता जायचे असेल त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग जावे. वडिलांच्या निकालासाठी ओमराजे निंबाळकरांवर दबाव संजय राऊत म्हणाले की, खून प्रकरणचा निकाल तुमच्या बाजूने हवा असेल तर तुम्ही या लेटरवर सही करा आणि आमच्यासोबत या. जर देशाचा कायदा आणि न्यायव्यवस्था या पद्धतीने चालत असेल तर तर काय संविधान आणि काय न्यायव्यवस्था त्यामुळेच या प्रकरणाचा निकाल दोन दिवस पुढे ढकलला गेला. संजय राऊत म्हणाले की, निवडून आलेल्या खासदारांना विकत घेण्याचा जे काम सुरू आहे ते लोकशाहीच्या विरोधात आहे. लोकसभा अध्यक्षांनी संविधानाचे पालन करत निर्णय घेतला पाहिजे. जो त्यांनी यापूर्वी घेतला नाही. खासदारांवर दबाव कशा प्रकारे येतात हे मी तुम्हाला सांगतो, 20 वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांची हत्या झाली. गेली 20 वर्षे तो खटला सुरू आहे, काल त्यांचा निकाल होता, मुंबई हायकोर्टात पण ओमराजे निंबाळकरांवर दबाव टाकण्यात आला की तुमच्या बाजूने निकाल हवा असेल तर आमच्या गटात या, असा दबाव त्यांच्यावर टाकण्यात आला आहे. पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सुनावणी 20 जूनला महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तब्बल दोन दशकांपासून गाजणाऱ्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड खटल्याच्या निकालाची प्रतीक्षा आणखी काही दिवसांनी वाढली आहे. या प्रकरणाचा अंतिम निकाल काल 16 जून रोजी लागण्याची दाट शक्यता होती; मात्र “निकाल देण्यासाठी आणखी काही दिवसांच्या अवधीची गरज आहे, असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले. त्यामुळे मुंबई सत्र न्यायालयाने या संवेदनशील खटल्याची पुढील सुनावणी आता येत्या 20 जून रोजी निश्चित केली आहे 2006 मध्ये झाली होती हत्या राजकीय वैमनस्यातून 3 जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दोन अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करून हा थरार घडवला होता. सीबीआयच्या तपासांनुसार, ही हत्या 25 लाखांची सुपारी देऊन घडवून आणली गेली होती आणि यामध्ये राज्याचे माजीमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील हे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप आहे. या खटल्यात डॉ. पाटील यांच्यासह शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग, छोटू पांडे, माजी नगरसेवक मोहन शुक्ला, उत्तर प्रदेशातील बसपा नेते कैलास यादव, शशीकांत कुलकर्णी, सतीश मंदाडे आणि पारसमल जैन असे एकूण 9 आरोपी आहेत. डॉ. पद्मसिंह पाटील हे सप्टेंबर 2009 पासून जामिनावर बाहेर आहेत.
