‘उद्धव ठाकरेंच्या खासदांना प्रत्येकी 15 कोटींचा 15 कोटींचा ॲडव्हान्स दिला गेला आहे. ही डील प्रत्येकी 50 कोटींची आहे. ओमराजे निंबाळकर यांच्यावर तर पवनराजे हत्याकांडाचा निकाल बाजूने हवा असेल, तर आमच्यासोबत या, असा दबाव आहे,’ असे गंभीर आरोप संजय राऊत यांनी केले. उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फुटणार या वृत्ताने खळबळ उडालीच होती. त्यातच संजय राऊतांच्या आरोपांनी गौप्यस्फोटाचा धमाका केला. महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या ‘ऑपरेशन टायगर’वर अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मोठी पत्रकार परिषद घेऊन आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली. अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि संजय राऊत यांनी एकत्र येत बंडखोरी करणाऱ्यांना थेट इशारा दिला. हा लोकशाहीचा केलेला तमाशा असून आता पुन्हा जर कोणी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्रातील जनता आणि शिवसैनिक गप्प बसणार नाहीत, असे या नेत्यांनी ठणकावून सांगितले. राऊत म्हणाले- 50 कोटी रुपयांमध्ये डील झाली खासदार संजय राऊत यांनी काल रात्रीच्या घडामोडींचा खुलासा केला. काल रात्री 11 वाजेच्या सुमारास मला एका विश्वासू सूत्राने माहिती दिली की, महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्याची मोठी डील झाली आहे. प्रत्येकी 50 कोटी रुपयांना खासदारांना विकत घेतले जात असून, काल रात्रीच 15 कोटींचा ॲडव्हान्स दिला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मी ती लगेच सोशल मीडियावर जाहीर केली. हे सर्व खासदार ‘मशाल’ चिन्हावर आणि उद्धव ठाकरेंच्या मेहनतीवर निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना बेईमानी करण्याचा कोणताही अधिकार नाही. ज्यांना आता जायचे असेल त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग जावे. येत्या 20 जूनच्या निकालापूर्वीच झाले आरोप महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तब्बल दोन दशकांपासून गाजणाऱ्या आणि 2006 मध्ये झालेल्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड खटल्याच्या निकालाची प्रतीक्षा आणखी काही दिवसांनी वाढली आहे. या प्रकरणाचा अंतिम निकाल काल 16 जून रोजी लागण्याची दाट शक्यता होती; मात्र “निकाल देण्यासाठी आणखी काही दिवसांच्या अवधीची गरज आहे, असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले. त्यामुळे मुंबई सत्र न्यायालयाने या संवेदनशील खटल्याची पुढील सुनावणी आता येत्या 20 जून रोजी निश्चित केली आहे. त्यापूर्वीच हे आरोप सुरू झालेत. शिवसैनिकांनी रक्त आटवून निवडून दिले, बेईमानी खपवून घेणार नाही- संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलताना खासदार संजय राऊत अत्यंत संतापलेले पाहायला मिळाले. ते म्हणाले, हे सर्व खासदार मशाल चिन्हावर, उद्धव ठाकरेंच्या नावावर आणि लाखो प्रामाणिक शिवसैनिकांच्या मेहनतीमुळे खासदार झाले आहेत. शिवसैनिकांनी दिवस-रात्र एक करून, स्वतःचे रक्त आटवून यांना निवडून दिले आहे. त्यामुळे या अशा पद्धतीने पक्षाशी बेईमानी करण्याचा अधिकार यांना कोणीही दिलेला नाही. ही निव्वळ डरपोकगिरी असून जनता आता हा तमाशा सहन करणार नाही. १४ जूनच्या बैठकीत घेतल्या होत्या साईबाबा आणि मुलांच्या शपथ संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी ‘मातोश्री’वर झालेल्या खासदारांच्या बैठकीचा धक्कादायक अंतर्गत किस्सा उघड केला. “१४ जून रोजी झालेल्या बैठकीला सर्व खासदार प्रत्यक्ष आणि ऑनलाईन उपस्थित होते. त्या बैठकीत एका खासदाराने तब्बल ५ वेळा साईबाबांची शपथ घेतली, दुसऱ्याने आई भवानीची तर एकाने स्वतःच्या पोटच्या मुलांची आणि आईची शपथ घेतली होती. बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगणारे हे खासदार जर आता ५० कोटी रुपयांच्या डीलसाठी विकले जात असतील, तर यांना जनता रस्त्यावर फिरू देणार नाही,” असा जळजळीत इशारा राऊत यांनी दिला. ऑपरेशन टायगर सोपं नाही- राऊत ज्यांना कुणाला आता सत्ताधाऱ्यांच्या गोटात जायचे असेल, त्यांनी आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग स्वतःच्या ताकदीवर निवडून येऊन दाखवावे, असे थेट आव्हान ठाकरे गटाने दिले आहे. राऊत यांनी स्पष्ट केले की, ‘ऑपरेशन टायगर’ करणे इतके सोपे नाही. पक्षाने या सर्व कायदेशीर बाबी लक्षात घेऊन तातडीने सर्व खासदारांसाठी अधिकृत व्हीप जारी केला आहे, तसेच दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही पक्षाच्या वतीने अधिकृत पत्र पाठवण्यात आले आहे. पक्षातील कुणीही अधिकृतपणे जाण्याची भूमिका मांडली नाही- सावंत खासदार अरविंद सावंत यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीत बोलताना सावंत म्हणाले की, संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठी मी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. आतापर्यंत आमच्या पक्षातील एकाही खासदाराने किंवा नेत्याने पक्ष सोडत असल्याचे आम्हाला सांगितलेले नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या खासदारांच्या फुटीच्या चर्चांवर सावंत यांनी थेट भाष्य करत, पक्षातील कुणीही अधिकृतपणे जाण्याची भूमिका मांडलेली नसल्याचे स्पष्ट केले. सविस्तर वाचा महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी 15 कोटींचा ॲडव्हान्स शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी मध्यरात्री एक अत्यंत खळबळजनक ट्विट करत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बॉम्ब टाकला आहे. महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी रात्रीत कोट्यवधी रुपयांचा ॲडव्हान्स वाटण्यात आल्याचा धक्कादायक दावा संजय राऊत यांनी केला आहे. सविस्तर वाचा
