राज्यात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवर भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत भाजपचा या घडामोडींशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला मजबूत सरकार मिळाले असून देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत, असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच संजय राऊत यांनी खासदारांना 15 कोटींचा ॲडव्हान्स दिल्याचा केलेला दावा अत्यंत चुकीचा आणि बिनबुडाचा असल्याचे त्यांनी म्हटले. पक्षाचे लोक का सोडून जात आहेत, याचे उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करावे बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर थेट निशाणा साधताना म्हटले की,”उद्धव ठाकरेंनी आधी स्वतःचा पक्ष सांभाळावा. त्यांचे आमदार आणि खासदार त्यांना सोडून का चालले आहेत? आपले लोक कुठे जात आहेत आणि का जात आहेत, याचे त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आपल्याच लोकांना सांभाळता येत नसल्याने विरोधक भाजपवर नाहक आरोप करत असल्याचा टोला त्यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे लोकप्रिय आणि मजबूत मुख्यमंत्री राज्यातील नेतृत्वावर बोलताना बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय आणि मजबूत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम पाहत आहेत. राज्याला एक मजबूत सरकार मिळाले असून देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत, असे म्हणत त्यांनी सरकार पूर्णपणे स्थिर असल्याचा संदेश दिला. संजय राऊतांनी रोज उठून खोटे आरोप करण्याऐवजी आपल्या पक्षात चाललेला असंतोष पहावा, असा खोचक सल्लाही बावनकुळे यांनी दिला आहे. उद्धवसेनेत पुन्हा फूट?: 6 खासदारांच्या ‘दिल्ली मिशन’मुळे महाराष्ट्रात खळबळ; शिंदेही राजधानीत, आज निर्णायक हालचालींची शक्यता
महाराष्ट्राच्या राजकारणात 2022 मधील शिवसेना फुटीनंतर पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील तब्बल सहा खासदारांनी दिल्लीत तळ ठोकल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. हे खासदार स्वतंत्र संसदीय गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत असून, त्यासाठी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सविस्तर वाचा
