तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून हा विभाग पूर्णपणे ‘अॅक्शन मोड’मध्ये आला असून, गेल्या महिनाभरात अवैध गुटखा विक्रेते, अन्नपदार्थांत भेसळ करणारे, तसेच हॉटेल आणि मेडिकल व्यावसायिकांवर कारवाईचा धडाकाच लावण्यात आला आहे. मुंढे यांच्या या धडक कारवाईमुळे गैरप्रकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, त्यांच्या या धडाकेबाज कार्यशैलीचे राज्यभरातून उत्स्फूर्त स्वागत होत आहे. याचाच प्रत्यय म्हणून काही शेतकऱ्यांनी चक्क त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत कृतज्ञता व्यक्त केली. तर दुसरीकडे, राज्याच्या एका माजी मंत्र्यांनीही मुंढे यांच्या या कामगिरीचे अनोख्या शैलीत कौतुक करत आता एक वेगळीच मागणी केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नेते आणि राज्याचे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांना पत्र पाठवून एक अत्यंत अनोखी आणि मार्मिक मागणी केली आहे. तुकाराम मुंढे यांच्या कठोर कारवाईमुळे सध्या राज्यातील भ्रष्टाचारी आणि भेसळखोरांचे धाबे दणाणले असून, त्यांच्याप्रमाणेच इतर सर्व खातेप्रमुखांनीही कर्तव्यदक्षतेने काम करावे अशी जनतेची अपेक्षा आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे घडत नसल्याची खंत व्यक्त करत, इतर अधिकाऱ्यांमध्येही अशीच धडक कार्यक्षमता निर्माण व्हावी यासाठी चक्क ‘तुकाराम मुंढे यांचे एक बाटली रक्त काढून ते आपणासह राज्यातील सर्व खातेप्रमुखांना थोडे-थोडे देण्यात यावे’, अशी उपहासात्मक आणि हटके मागणी सुबोध सावजी यांनी या पत्राद्वारे केली आहे. तुकाराम मुंढे यांचे रक्त सर्व खाते प्रमुखांना द्यावे सुबोध सावजी म्हणाले, तुकाराम मुंढे यांचे एक बाटली रक्त काढून ते थोडे थोडे आपणांसह राज्यातील सर्व खाते प्रमुखांना द्यावे, जेणेकरून त्यांच्यासारखी काम करण्याची प्रेरणा व कार्यक्षमता निर्माण होऊन महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल. ज्याप्रमाणे अशक्त रुग्णाला रक्ताची बॉटल देऊन बरे करण्यात येत त्याचप्रमाणे तुकाराम मुंढे यांचे रक्त देऊन आपणासह सर्व राज्यातील खातेप्रमुखांना काम करण्याची शक्ती मिळेल. अशक्त रुग्णाला सशक्त रुग्णाचे रक्त देऊन बरे करण्यात येते. त्यामुळे, तुकाराम मुंढेंचं रक्त राज्यातील सर्वच शासकीय प्रमुखांना द्यावं, म्हणजे तुकाराम मुंढेंसारखं काम करण्याची प्रेरणा आणि शक्ती राज्यातील सर्वच विभागाच्या खातेप्रमुखांना मिळेल, असेही सुबोध सावजी यांनी म्हटले आहे.
