Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा’:नव्या रस्त्याला वर्षही होऊ दिलं नाही, तो फोडला, नळाला गटाराचे पाणी, संभाजीनगरमधील नागरिकांच्या संतापाचा पारा!

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक जशी जवळ येत आहे, तशीच शहराच्या झाकून ठेवलेल्या वेदनांची फाईल उघडू लागली आहे. दिव्य मराठीतर्फे आयोजित ‘लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा’ या टॉक शोमध्ये प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकांनी मोकळेपणाने मांडलेले अनुभव केवळ तक्रारी नाहीत, तर वर्षानुवर्षांच्या दुर्लक्षाची साक्ष देणारे वास्तव आहे. स्वच्छ पिण्याच्या पाण्याऐवजी नळातून गटाराचे पाणी येते, कचऱ्याचे ढीग वस्त्यांच्या उंबरठ्यावर साचले आहेत, वर्षभरातच रस्ते फोडून नागरिकांचे हाल केले जात आहेत, तर वीज, ड्रेनेज आणि सार्वजनिक आरोग्य यंत्रणा कोलमडलेल्या अवस्थेत आहेत. निवडणूक जवळ आली की कामे सुरू होतात, उद्घाटने होतात; मात्र नागरिकांच्या दैनंदिन जगण्यातील प्रश्न तसेच राहतात. ‘आम्ही कचऱ्यात जगतो’, ‘घरातून बाहेर पडणंही कठीण झालं आहे’ या शब्दांतून प्रभाग ८ मधील असह्य वास्तव समोर आले असून, ही केवळ एका प्रभागाची कथा नसून, संपूर्ण शहराच्या नागरी व्यवस्थेचे विदारक प्रतिबिंब ठरत आहे.कोणत्या समस्या या नागरिकांना त्रास देत आहेत जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्ट मधून… पिण्याच्या पाण्यात गटाराचे पाणी आंबेडकर नगर मध्ये राहणाऱ्या रहिवासी तान्हाबाई पोटफोडे म्हणतात की, ‘आमच्याकडे जेव्हा पाणी सोडल जात तेव्हा दूषित पाणी येते. ड्रेनेज लाईन सगळ्या फुटलेल्या आहेत. त्यामुळे तेच पाणी पिण्याच्या पाईप मध्ये उतरत आणि तसच मिक्स होऊन पाणी येते. आम्हाला लाईटचा सुद्धा इतका त्रास आहे की, ज्या दिवशी पाणी येईन त्याच दिवशी त्याच वेळेला आमची लाईट जाते. हा त्रास पूर्ण गल्लीला आहे. त्यामुळे एवढा त्रास आमचा सोडवावा हीच अपेक्षा आहे.’ मुबलक-स्वच्छ पाणी देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत देशमुख म्हणाले की, आमच्या प्रभागात अनेक समस्या आहेत. यामध्ये मुख्य समस्या आहे ती म्हणजे प्रभागात आरोग्य केंद्र नाही. बाजूच्या प्रभागात जावे लागते. ते सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर परिसरातील मैदाने विकसित करण्याचा आमचा मानस आहे. मागच्या नगरसेवकांनी काहीच कामे केलेली नाहीत. त्याच्या कार्यालयासमोरच मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलेले असते. अनेक कामे पूर्वी मंजूर झाली असून आता निवडणुकीच्या तोंडावर मतदान मिळावे म्हणनू सुरू करण्यात आली आहेत. यासोबतच प्रभागात पिण्याचा पाण्याचा विषय देखील गंभीर झाला आहे. माझ्या प्रभागात सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो पाण्याचा त्यावर सत्ताधारी सर्वच पक्षांकडून राजकारण केले जात आहे. मुबलक आणि स्वच्छ पाणी देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. पाण्याची वेळ बदलून महिलांना त्रास होणार नाही अशा वेळी पाणी देण्याचा आमचा प्रयत्न असेल. 39 हजारांपेक्षा जास्त मतदार असणाऱ्या प्रभागाचे नगरसेवक त्यांच्या आफीस ते घर रस्ता व्यवस्थित करू शकत नाही ते प्रभागाला काय न्याय देऊ शकतील. आमच्या प्रभागात केवळ बिले काढण्यासाठी कामे केली आहे. जनता त्यांच्यावर नाराज आहे, ठेकेदारांची घरे भरण्याचे काम मागील लोकप्रतिनिधींनी केले आहे. चांगला रस्ता फोडून टाकला प्रभागातील रहिवासी प्रकाश पोटफोडे म्हणाले ,’आमच्या घरासमोर जो रस्ता बांधला त्याला एक वर्ष झाले. मात्र तो आता पाण्याची पाईपलाईन टाकायची म्हणून फोडून टाकला. यामुळे आम्हाला याचा एवढा त्रास होतोय की, घराच्या बाहेर निघता पण येत नाहीये. घरात म्हातारे लोक आहेत. त्यांनी कस राहावं. लहान मुलं इथे खेळतात. ते त्या खड्यात पडत आहेत. या फोडलेल्या रस्त्यामुळे अनेकांच्या ड्रेनेज लाईन पण फुटल्या आहेत. त्यामुळं ते घाणरेडे पाणी पिण्याच्या पाण्यात येतंय. दूषित पाण्यामुळे आमच्या गल्लीतले अनेक लोक आजारी पडले आहेत. आधी चांगले रस्ते करतात , मग ते फोडतात आणि पाईपलाईन टाकायची म्हणून आम्हाला गप्प बसवतात.’ नशेखोर मुलांचे प्रमाण वाढतंय राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार महेश जाधव म्हणाले की, आमच्या प्रभागात वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा खूप मोठा आहे. नशेखोर मुलांचे प्रमाण वाढत आहे. मुले नशेखोरर होऊ नये यासाठी आम्ही संस्कार केंद्र सुरू करणार आहोत. तर दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी आणि बसण्यासाठी नाना-नानी पार्क सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आमच्या प्रभागातील अनेक तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांच्यासाठी आम्ही अभ्यासिका उभारण्याकडे लक्ष देणार आहोत. माझ्या प्रभागातील सर्वात मोठी समस्या ही देशी दारुचे आहे त्यामुळे महिलांना सुरक्षित असल्याची भावना येत नाही. यासाठी आम्ही अनेक आंदोलने केली आहेत. अनेक अल्पवयीन मुले नशेखोर झाले आहेत. रोजगार, व्यसनमुक्ती या मुद्यावर काम करणार आहे. कचरा गाडी येत नाही, पाणी येते तर ते गढूळ पाणी येते. हे थांबले पाहिजे. त्यासाठी आम्ही लढा देत आहोत. चोहीकडे कचऱ्याचे साम्राज्य नारेगाव भागात राहणारे रहिवासी उबेद बागवान म्हणतात ,’वीस वर्षांपासून ही वस्ती निर्माण झाली आहे. तेव्हापासून आमच्याकडे कचऱ्याची मोठी गंगाच वाहते. गल्ली म्हणू नका, रस्ता म्हणू नका, सोसायट्या जिथे तिथे तुम्हाला कचराच पाहायला मिळेल. आमच्यकडे कचऱ्याचे साम्राज्य आहे. महानगरपालिकावाले इथे येत नाहीत, पाहत नाहीत की आम्हाला काय त्रास होतोय ते. घंटा गाडी आमच्याकडे आठवड्याला एकदा येते. त्यामुळे साचलेला कचरा आम्ही खुल्या जागेवर किंवा मग नाल्यात टाकतो. जेव्हा घंटा गाडीवाला येतो तेव्हा एका ठिकाणी थांबतो आणि सगळ्यांना शिट्टी वाजवून तिथेच बोलवतो. आता मला सांगा एवढा साचलेला कचरा प्रत्येकानी दुरून कसा आणावा. आमच्याकडे जारच्या पाण्याच्या गाड्या येतात. मग घंटा गाडीवाला का नाही?’ असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला. निवडणुकीच्या तोंडावर कामे सुरू राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार लता गायकवाड म्हणाल्या की, आमच्या परिसरात सर्वात मोठी समस्या आहे ती पाण्याची आहे. आमच्या प्रभागात पाणी 10 दिवसांनी येते. एक तासभर पाणी येते यातही दुषित पाणी येते. यासोबतच ड्रेनेज आणि कचऱ्याची समस्या आमच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. यातच अल्पवयीन मुलांचे नशेखोरीकडे वळण्याचे प्रमाण देखील वाढलेले आहे. ते चांगल्या मार्गावर यावे यासाठी प्रयत्न करणार आहोत. आमच्या प्रभागात रस्त्याची अनेक कामे अर्धवट सोडण्यात आलेली आहेत. अनेक दिवस न झालेली कामे निवडणुकीच्या तोंडावर सुरू करण्यात आलेली आहेत. या कामांची उद्घाटने होऊन 3 वर्षे होऊन गेली आहेत. या आहेत समस्या प्रभागातील मोठी वसाहत असलेल्या मयूर पार्ककडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अतिक्रमण, पथविक्रेत्यांचा भरणा यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.पावसाळ्यात मयूर पार्क, मारुतीनगर, जाधववाडी या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. प्रभागात विजेची मोठी समस्या आहे. रोज अनेक वेळा वीजपुरवठा काही मिनिटांसाठी खंडित होत असतो. विशेषतः सकाळच्या सत्रात वीज नसल्याने नोकरदार वर्गाचे हाल होतात. पाणी, ड्रेनेज व गॅसची पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात मयूर पार्क, मारुतीनगर, जाधववाडी, सुरेवाडीत रस्त्यांवर पाणी साचते. रस्ते चिखलमय होत असल्याने ग्रामीण भागातील रस्ते बरे, असे म्हणण्याची वेळ येत आहे. मयूर पार्क, सुरेवाडी भागात कचरा नेण्यासाठी घंटागाड्या नियमितपणे येतात. जाधववाडी बाजार समिती परिसरात मात्र कचरा उचलला जात नाही. ८ दिवसांआड पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त प्रभागातील विविध वसाहतींमध्ये ८ दिवसांआड पाणी येते. मात्र, पाणी पुरेशा दाबाने सोडले जात नाही. त्यामुळे नागरिकांना विद्युत पंप वापरावा लागतो. अशी आहे प्रभागाची व्याप्ती प्रभाग क्रमांक ८ मध्ये मयूरपार्क, ऑडिटर सोसायटी, सिद्धेश्वर नगर, राजे संभाजीनगर, म्हस्केवाडी, प्रथमेश सोसायटी, गुरुदत्त नगर, सुजाता सोसायटी, नाथनगर, सुरेवाडी, वसंतनगर अर्धवट, एस.टी. कॉलनी, गोकुळ नगर, सिद्धेश्वर नगर, म्हसोबानगर भाग, भक्तीनगर, कृषी उत्पन्न बाजार समिती, मिसारवाडी भाग, M.I.D.C. चिकलठाणा, सनी सेंटर, राठी संसार, आरती नगर भाग, आंबेडकर नगर, फुलेनगर, गौतम नगर, जाधववाडी, रामकृष्ण सोसायटी, मारुती नगर, भवानी नगर, नारेगाव भागश: यांचा समावेश होतो.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!