नागपूरमधील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आराधना नगर परिसरात एका गॅरेजला बुधवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या चार गाड्या जळून खाक झाल्या, ज्यात सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे शेजारील सुमारे 50 लाख रुपयांची मालमत्ता वाचवण्यात यश आले. आराधना नगर येथील सातपुडा बारच्या बाजूला असलेल्या ‘साहिल गॅरेज’मध्ये ही घटना घडली. गॅरेजचे मालक अनंत सुधाकर काळे यांच्या माहितीनुसार, सकाळी 6 वाजण्यापूर्वी अचानक आग लागली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ अग्निशमन केंद्राला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच, वाठोडा अग्निशमन केंद्राचे केंद्र अधिकारी चंद्रशेखर आर. रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली दोन अग्निशामक वाहने आणि लकडगंज अग्निशमन केंद्राचे एक वाहन अवघ्या दोन मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तात्काळ आग विझवण्याचे काम सुरू केले.
या आगीत एमएच 47 वाय 9817 आणि एमएच 41 वाय 3646 या दोन गाड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या. तसेच, एमएच 31 एफसी 5005 ही गाडी अंशतः जळाली, तर एमएच 31 सीजी 9047 ही भंगार (स्क्रॅप) गाडीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वाठोडा आणि लकडगंज अग्निशमन केंद्राच्या जवानांनी संयुक्तरीत्या पाण्याचा मारा करून काही वेळातच आग पूर्णपणे आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या या जलद कारवाईमुळे गॅरेजमधील व आसपासची तब्बल 50 लाख रुपयांची मालमत्ता सुरक्षित राहिली.
