शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील संभाव्य बंडाच्या चर्चांदरम्यान खासदार संजय राऊत यांनी संशयित बंडखोर खासदारांवर केलेल्या टीकेनंतर आता शिंदे गटाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी राऊतांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत, खासदारांना शिवीगाळ करणे आणि त्यांचा अपमान करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले, तुम्ही पाहिलंच असेल की संजय राऊत कशाप्रकारे शिवीगाळ करत आहेत. एखादा खासदार अनेक वर्षे राजकारणात काम करत असतो, जिल्ह्याचं नेतृत्व करत असतो. अशा लोकांचा अपमान करणे आणि त्यांना शिव्या देणे योग्य नाही. ही नाराजी आजची नाही – शिरसाट उद्धवसेनेतील सध्याच्या घडामोडींवर भाष्य करताना संजय शिरसाट यांनी पक्षातील असंतोष बराच काळ साचलेला असल्याचा दावा केला. “ही प्रक्रिया आजची नाही. बऱ्याच काळापासून काहीतरी सुरू असावे. त्याचाच परिणाम म्हणून आज खासदारांना त्यांच्यासोबत राहायचे नाही, असा टोला त्यांनी लगावला. त्यांच्या या वक्तव्यामुळे उद्धवसेनेतील संभाव्य बंड हे केवळ राजकीय दबावाचे परिणाम नसून पक्षांतर्गत नाराजीचे फलित असल्याचा संदेश शिंदे गटाकडून देण्याचा प्रयत्न होत असल्याचे मानले जात आहे. संजय राऊत पांढऱ्या पायाचे- गुलाबराव पाटील ठाकरे गटातील खासदार फुटीच्या चर्चांदरम्यान मंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले, संजय राऊत हे पांढऱ्या पायाचे माणूस आहेत. त्यांनी पक्षाची सूत्रे हातात घेतल्यापासून शिवसेनेची अधोगती सुरू झाली आहे. ऑपरेशन टायगर नव्हे, ऑपरेशन बाजार- रोहित पवार रोहित पवार यांनी सोशल मिडियावर संताप व्यक्त केला आहे. लोकशाहीच्या सद्यस्थितीवर बोट ठेवत लिहिले, “लग्न एकासोबत करायचं आणि भलत्याचाच हात धरून पळून जायचं… हा अत्यंत किळसवाणा राजकीय व्यभिचार असून संविधान व लोकशाही मोडून हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू असल्याचं हे लक्षण आहे. याला ‘ऑपरेशन टायगर’ नाही तर ‘ऑपरेशन बाजार’ म्हणावं लागेल. आणि हा ‘ऑपरेशन बाजार’ लायकीचा, माणसांचा की विचारांचा हे आता लोकंच ठरवतील. ठाकरेंचे 6 खासदार फुटले!:लोकसभा अध्यक्षांची उबाठाच्या नव्या स्वतंत्र गटाला मंजुरी, विलीनीकरणाचा मार्ग मोकळा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणाऱ्या ‘ऑपरेशन टायगर’ला अखेर यश आल्याचे चित्र दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी केलेल्या हालचालींना लोकसभा स्तरावर मान्यता मिळाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासंदर्भातील अर्ज मंगळवारीच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सादर केला होता. सविस्तर वाचा
